एकीकडे पृथ्वी शाॅने भारतीय संघाला U-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारून दिली असताना दुसरीकडे त्याचा मुंबई संघात समावेश करावा की नाही, यावरून बरेच रणकंदन माजलं. विजय हजारे स्पर्धेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत अाहे. मात्र त्यावेळी तो उपलब्ध नसल्याने मुंबईच्या संघात त्याचा समावेश करण्यात अाला नव्हता, त्यामुळे निवड समितीवर कडाडून टीका झाली होती. मात्र U-19 विश्वचषक स्पर्धा अाटोपून भारताचा संघ ५ फेब्रुवारीलाच भारतात परतणार अाहे. त्यामुळे निवड समितीला अापली चूक उमगल्यानंतर त्याचा पुन्हा मुंबई संघात समावेश करण्यात अाला अाहे.
चेन्नईमध्ये रंगणाऱ्या विजय हजारे या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या संघात १५ खेळाडूंमध्ये पृथ्वीचा समावेश करण्यात अाला नव्हता. मात्र सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसलेला पृथ्वी नंतरच्या सामन्यांसाठी उपलब्ध असल्यामुळे एमसीएने १६ खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यात पृथ्वी शाॅचा समावेश करण्यात अाला अाहे. अादित्य तरेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचा पहिला सामना ५ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशविरुद्ध होणार अाहे.
आयसीसी U-19 वर्ल्डकपमध्ये पृथ्वी भारताचं नेतृत्व करत आहे. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं फायनलमध्ये मजल मारली असून भारताला चौथ्या विश्वचषक विजेतेपदासाठी अाता अाॅस्ट्रेलियाशी लढत द्यावी लागणार अाहे. रणजी ट्राॅफी तसंच मुश्ताक अली स्पर्धेत अपयशी ठरलेला मुंबईचा संघ अाता चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक अाहे. त्यामुळे मुंबईला छोट्या चणीच्या पृथ्वी शाॅकडून मोठ्या अपेक्षा अाहेत.
आदित्य तरे (कर्णधार), धवल कुलकर्णी, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर, जय बिस्ता, शिवम दुबे, शशांक सिंग, एकनाथ केरकर, आकाश पारकर, ध्रुमिल मटकर, रॉयस्टन डायस, शम्स मुलाणी, शुभम रांजणे, शिवम मल्होत्रा अाणि पृथ्वी शॉ.