मुंबईतील वर्सोवा समुद्रात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ४ मित्र पोहण्यासाठी उतरले होते. खोल समुद्रात गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेहीजण बुडू लागले. त्यापैकी तिघांजणांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून एक जण अद्याप बेपत्ता आहे. या मुलाचा अग्निशमन दल आणि सागरी पोलिस शोध घेत आहेत.
ही घटना वर्सोवा जेट्टीजवळ दुपारी घडली. आयुष खंडू रईदर (१३), हर्ष अमोल कोळी (१२), रिहान अब्बास अन्सारी (१३) आणि वैभव राकेश गौड (१३) हे चौघे मित्र पोहण्यासाठी समुद्रात उतरले. समुद्रातील खोल पाण्यात गेल्यानंतर ते बुडू लागले.
यावेळी जेट्टी परिसरात स्थानिकांची थोडीफार वर्दळ होती. त्यामुळे स्थानिकांनी या मुलांना बुडताना बघितल्यावर तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. पाण्यात उतरून स्थानिकांनी तिघांना वाचवलं, पण वैभव गौड या मुलाचा शोध लागू शकला नाही.
त्यानंतर अग्निशमन दल आणि सागरी पोलिसांच्या मदतीने या बेपत्ता मुलाचा शोध सुरू करण्यात आला.