गणपतीसाठी कोकणात निघालेल्या 6 मुंबईकरांचा लांजानजीक मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. हनुमंत मांजळकर (३४), मानसी हनुमंत मांजळकर (३०), भार्गवी हनुमंत मांजळकर (६), राजेश बाबू शिवगण (२४), पंकज हेमंत घाणेकर (२५) आणि प्रियांका उपळकर (२१) अशी या मृत व्यक्तींची नावं आहेत. हे सर्वजण मुंबईच्या दहिसर येथील रहिवासी आहेत.
दहिसर पूर्वेकडे असलेल्या ज्ञानेश्वर नगर येथील रावळपाडा परिसरात राहणारे मांजळकर कुटुंब आणि जवळचे नातेवाईक गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजापुरातील कोंडे या गावी मुंबई-गोवा महामार्गे मंगळवारी निघाले होते.
या प्रवासादरम्यान मध्यरात्री भरधाव वेगात असलेल्या एका खासगी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी त्या बसने मांजळकर कुटुंबिय प्रवास करत असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचा चक्काचूर झाला, तर गाडीतील सहाही जणांना जागीच प्राणाला मुकावे लागले.
या भीषण अपघातात बसमधील लऊ उपळकर, मंगेश उपळकर, अंकुश उपळकर, हनुमंत उपळकर, सार्थक उपळकर, किरण तरळ, आराम बसचालक नितीन जाधव, क्लीनर संदेश कांबळे हे जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूरमधील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.