'त्या' प्रकरणी समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकानं आर्यन खानसह ८ जणांना ताब्यात घेतलं. मात्र, आर्यन खानच्या अटकेनंतर राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये वादविवाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

'त्या' प्रकरणी समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
SHARES

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गेल्या आठवड्यात मुंबई समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी करताना पकडण्यात आलं होतं. याप्रकऱणी केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकानं आर्यन खानसह ८ जणांना ताब्यात घेतलं. मात्र, आर्यन खानच्या अटकेनंतर राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये वादविवाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय, केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे.

वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व २ पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते.

याप्रकरणी वानखेडे यांनी काही लोक माझ्या हलचालींवर लक्ष ठेऊन आहेत, असं वानखेडे यांनी जैन आणि पांडे यांना सांगितल्याची माहिती मिळते. २ जण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे असं सांगत वानखेडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

आर्यन खानचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून देण्यात आला आहे. क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसताना त्याला कोठडीत ठेवणे उचित नाही. असे करून त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावले जात आहे. त्यामुळे त्याच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी आर्यनच्या वकिलांनी सोमवारी विशेष सत्र न्यायालयात केली होती.

जामीन अर्जावर तातडीनं सुनावणीची आवश्यकता नसल्याचं सांगत अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आठवड्याची वेळ देण्याची मागणी एनसीबीतर्फे करण्यात आली. न्यायालयानं मात्र प्रकरणावरील सुनावणी बुधवारी ठेवत एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

२ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसहीत ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या ८ ही जणांपैकी कोणालाही अद्याप जामीन मंजूर करण्यात आलेला नाही.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा