नक्षली संबंधांच्या संशयावरून ज्या ५ डाव्या विचारवंतांवर पोलिसांनी कारवाई केली, त्या ५ विचारवंतांच्या घरी-कार्यालयात केलेल्या छापेमारीत हजारो संशयास्पद कागदपत्रे, ई-मेल, असा दस्तावेज पोलिसांच्या हाती आला. या दस्तावेजानुसार देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडवून सरकार उलथवण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचं पुढं आलं. सबळ पुराव्याच्या आधारानेच या पाचही जणांना अटक केल्याचा दावा पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग यांनी शुक्रवारी केला. ५ विचारवंतांच्या अटकेच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी ही माहिती दिली.
२९ ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरात ९ ठिकाणी छापे मारत नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांवरुन वरावर राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्साल्विस यांना अटक केली होती. या अटकेवरून डाव्या संघटनांकडून पोलिसांवर टीका होत असताना आणि मानवाधिकार आयोगाने सरकारला नोटीस पाठवलेेली असताना पोलिसांनी आपली बाजू मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
देशभरात ९ ठिकाणी मारलेल्या छाप्यात पोलिसांनी हजारो कागदपत्रे, काॅम्प्युटर्स, लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेतले. या सर्व छाप्यांचं व्हिडिओ शूटींग देखील करण्यात आलं. हे सगळे पुरावे आम्ही फाॅरेन्सिक लॅबकडे पाठवल्याचं सिंग म्हणाले.
पोलिसांच्या हाती आलेले ई-मेल, पत्रे व अन्य साहित्यातून मोठ्या षडयंत्राची माहिती समोर आली. या माहितीनुसार नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा विकत घेण्याचा, त्याद्वारे देशात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि केंद्रातील सरकार उलथवण्याचा कट होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात फंडिगही झालं. त्याअंतर्गत १५ लाख रुपयांचं पेमेंट करण्यात आलं होतं. त्यावरून या पाचही जणांचे माओवाद्यांशी संबध असल्याचंही स्पष्ट होत असल्याचं सिंग यांनी सांगितलं.
यावेळी कॉम्रेड सुदर्शन यांनी कॉम्रेड गौतम नवलखा यांना लिहिलेलं पत्रही पोलिसांनी वाचून दाखवलं. रोना विल्सन यांनी ४ लाख राऊंड, ग्रेनेड आणि ८ कोटी रुपयांचा उल्लेख असलेलं पत्र कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलं होतं. यांत मोदींच्या हत्येचा कटही होता. कॉम्रेड सुधा भारद्वाज यांचंही पत्र पोलिसांनी वाचून दाखवलं. रोना विल्सननी मिलिंद तेलतुंबडे यांना लिहिलेल्या पत्रात भीमा कोरेगाव दंगलीत एल्गार परिषद महत्त्वाची ठरल्याचा उल्लेख केला होता. भाजपाच्या ब्राह्मणी कार्याविरोधात दलितांचं आंदोलन उभं करण्याचाही त्यात उल्लेख असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.
या पाचही जणांची आम्हाला कोठडी हवी असून सगळ्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची चौकशी करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत पाचही जणांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्थानबद्धतेत ठेवण्यात आल्याची माहितीही परमवीर सिंग यांनी दिली.
हेही वाचा-
डाव्या विचारवंतांना अटक : मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस
सनातनला वाचवण्यासाठी डाव्या विचारवंतांना अटक- न्या. बी. जी. कोळसे पाटील