कोरेगाव भीमा हिंसाचार अाणि नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संशयावरून वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा या डाव्या विचारवंतांना पुणे पोलिसांनी अटक केली अाहे. या कारवाईची दखल अाता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली अाहे. मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी याअाधी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंसह, वकिल सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांना अटक केली होती. मंगळवारी पुणे पोलिसांनी वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांनी अटक केली. अटक करताना पोलिसांना नियमांचं पालन केलेलं नसल्याचं दिसून येत अाहे, असं मानवाधिकार आयोगाने अापल्या नोटिसीत म्हटलं अाहे. या कारवाईबाबत ४ अाठवड्यांमध्ये उत्तर देण्याचा अादेश अायोगाने दिला अाहे.
अटकेचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अाणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी तीव्र निषेध केला आहे. महाराष्ट्रातलं भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असून दलितांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अारोप मायावती यांनी केला अाहे. कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही या कारवाईविरोधात जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे समर्थन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं अाहे. पुरावे हाती अाल्यानंतर कारवाई केली अाहे. पोलिस कधीही पुराव्याशिवाय कारवाई करत नाहीत, असं केसरकर यांनी म्हटलं अाहे. नक्षलवादाचं कोणी समर्थन कसं काय करू शकतं. हे लोक स्वत:चं वेगळं सरकार चालवत असून हे लोकशाहीसाठी हे चांगलं नाही, असेही केसरकर म्हणाले.
हेही वाचा -
डाॅ. दाभोलकर हत्या प्रकरण: 'असं' झालं टार्गेट सेट!
शरद कळसकरचा ताबा सीबीआयला नाही!