छत्तीसगढ येथे निवडणुकीच्या प्रचारात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. स्वांतत्र्यवीर सावकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
छत्तीसगढ येथील जगदलपूर येथे जाहीर सभेत राहुल गांधी यांनी सावकर यांनी ब्रिटिश सरकारची माफी मागून स्वतःची सुटका केल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. या वक्तव्याची गंभीर दखल घेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावकर यांनी आता थेट पोलिसात धाव घेतली आहे. रणजीत सावकर यांनी पोलिसांना लेखी तक्रार देत, क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांची बदनामी केली जात आहे. सावरकरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला. त्याचबरोबर असंख्य क्रांतिकारकांनीही अंदमानात यम यातना भोगल्या. सावरकरांनी केवळ आपलीच नव्हे तर अन्य क्रांतीकारकांचीही सुटका व्हावी यासाठी अर्ज केले होते. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही केवळ सावरकरच नव्हे तर सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती. त्यावेळीचे तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी, सावरकरांच्या अर्जात कुठलाही खेद अथवा खंत नसल्याचे नोंदवत सावरकर अत्यंत धोकादायक कैदी असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचं म्हटलं होतं.
ब्रिटिशांनी सावरकरांना १४ वर्षे कारागृहात आणि नंतर १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. असं असतानाही राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची हात जोडून माफी मागितली' असे खोटे विधान करून या महान देशभक्ताचा अपमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असं रणजित सावरकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा -
अभिनेत्री अक्षरा हसनचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर
दुर्मिळ कासवांची तस्करी करणारे अटकेत