करोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता 1001 वर जाऊन पोहचला आहे. कोरोना या संसर्ग रोगाने मंगळवारी मध्यराञी मुंबईच्या शिवडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, गुरूवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील 45 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर कंळबोली येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 9 पोलिस कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यात मुंबईत 6 तर पुणे, सोलापूर आणि नाशिक येथील एक-एक पोलिस कर्मचारीचा समावेश आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मृत पोलिसाला काही दिवसांपूर्वी त्यांच्यात कोरोनाची लक्षण आढळल्याने त्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्याचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला. त्यांच्यावर कंळबोलीतील MGM रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले होते. माञ गुरूवारी त्यांची कोरोना विरोधातली झुंज अपयशी ठरली. एका मागोमाग एक पोलिस दलात ही कोरोनाचा कहर वाढत असताना, पोलिसांमध्ये ही अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यातच 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे कौतुक करावे तितकेच कमी...
मुंबई पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत मुंबईतील 309 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. माञ पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो.
यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे. राज्यात 1001 पोलिसांना करोनाची लागण झाली असून, आतापर्यंत 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 1001 पोलिसांमध्ये 107 अधिकारी आणि 894 कर्मचारी यांचा समावेश आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच मुंबई पोलिस दलातील अस्वस्थता दूर करण्यासाठी स्वत: पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
पोलिसांना विश्रांतीची गरज - उद्धव ठाकरे
केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे इथं भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. इथं डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचं काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.