कठुआ बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देश खवळलेला असताना देशाची अार्थिक राजधानी मुंबईतही अल्पवयीन मुली अाणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर अाला अाहे. पोलिसांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी ५ मुली बेपत्ता होत आहेत. तर ३ महिन्यांत पोस्कोच्या गुन्ह्यांची संख्या १२३ वर पोहोचली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांनी ५०० चा आकडा पार केला आहे. महिन्याभरात मुंबईत महिला अत्याचाराचे शेकडो गुन्हे नोंदवण्यात अाले अाहेत.
शहरात बेपत्ता मुले-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुला-मुलींचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणं आणि अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचं प्रमाण वाढत अाहे. अनेकदा पोलिसांनी या टोळ्यांच्या मुसक्या अावळल्या अाहेत. मात्र पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होऊ लागल्यानंतर अपहरणकर्ते पुन्हा सक्रिय झाले अाहेत.
जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान ३६५ मुलींचं अपहरण झालं असून २३८ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. १२८ मुली आजही बेपत्ता आहेत. २ वर्षांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांचं प्रमाण लक्षात घेता, सरासरी दररोज ५ मुले बेपत्ता होत असल्याचं अाकडेवारी सांगते.
मायानगरी मुंबईत महिलांवरील अत्याचाराबाबतची अाकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी अाहे. चालू वर्षांत मुंबईत दरदिवशी २ महिलांवर बलात्कार होतात आणि ५ महिलांचे विनयभंग होतात. तर दरदिवशी २ महिलांचं अपहरण केलं जातं, अशी अाकडेवारी मुंबई पोलिसांनी दिली अाहे. या वर्षी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या १२३ (पोस्को) गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी ११४ गुन्ह्यांचा उलगडा मुंबई पोलिसांनी केला अाहे.
दुसरीकडे शहरात अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांकडून विनयभंगाचे गुन्हे नोंदवण्याचं प्रमाणही लक्षणीय आहे. ३ महिन्यांत मुंबईत ६८२ विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी ५१५ जणांना अटक केली आहे. मार्च महिन्यात २३६ विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती.
हेही वाचा -
वेगाची नशा नडली, बाइकस्वार पोहोचला रुग्णालयात
एअरपोर्ट पोलिस ठाण्यातली 'मर्दानी'