लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 3 लाख 32 हजार 343 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्या 1 लाख 3 हजार 345 गुन्हे नोंद झाले असून 19 हजार 630 व्यक्तींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 87 लाख 50 हजार 494 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत असताना. अनेकदा काही टवाळखोरांकडून पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 207 घटना घडल्या. त्यात 747 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
100 नंबरवर आतापर्यंत 88 हजार मदतीसाठी फोन
पोलीस विभागाकडून मदतीसाठी 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लाँकडाऊन च्या काळात या फोनवर 88 हजार 623 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 662 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. तसेच या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1291 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 55हजार 784 वाहने जप्त करण्यात आली आहेत.तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
विशेष पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 4, पुणे 1, सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1 अशा 7 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. तर 91 पोलीस अधिकारी व 796 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.