ब्लूटूथ नाही दिले म्हणून चाकूने गळ्यावर वार! वडाळ्यातली घटना

केवळ ब्लूटूथ हेडफोन दिले नाहीत, म्हणून एकाने दुसऱ्याच्या गळ्यावर चाकूने वार केले.

ब्लूटूथ नाही दिले म्हणून चाकूने गळ्यावर वार! वडाळ्यातली घटना
SHARES

क्षुल्लक कारणांवरून जीवघेणा हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशा कारणांवरून राग अनावर होऊन असे हल्ले केले जात आहेत. प्रसंगी यामध्ये जीव जाण्याच्या घटनांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अशीच एक घटना मुंबई वडाळा परिसरात घडली आहे. केवळ ब्लूटूथ हेडफोन दिले नाहीत, म्हणून एकाने दुसऱ्याच्या गळ्यावर चाकूने वार केले आहेत.


काय झालं?

दत्तात्रय जाधव(४७) आणि मनोज गुप्ता(२३) हे वडाळ्याच्या कोरंबा मिठाघर परिसरात रहातात. या दोघांचा एकमेकांशी अल्प परिचय आहे. शनिवारी रात्री मनोजने एक कॉल करण्यासाठी दत्तात्रयकडे मोबाईल मागितला. दत्तात्रयनेही फोन लावून तो मनोजकडे दिला. मात्र, फोन न लागल्यामुळे मनोजने तो परत दिला.

थोड्याच वेळात दत्तात्रयच्या फोनवर एक फोन आला. त्यावर कानात लावलेल्या ब्लूटूथ हेडफोनवर बोलायला दत्तात्रयने सुरुवात केली. दरम्यान, हा फोन आपलाच आहे असा समज मनोजचा झाला. त्याने मोबाईल मागितला, तरी दत्तात्रयने त्याला मोबाईल न देता तो बोलत बोलत पुढे निघून गेला.


गैरसमज झाला म्हणून थेट वार केले

नेमक्या याच गोष्टीचा राग आल्यामुळे मनोजने मागून दत्तात्रयचं तोंड दाबलं आणि त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, प्रकरण समोर येताच वडाळा पोलिसांनी आरोपी मनोज गुप्ताला अटक करून कोर्टात हजर केलं. रविवारी न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केला. गुन्ह्यातील हत्यार म्हणजेच चाकू पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणातील आरोपीला आम्ही भादंवि ३०७ (हत्येचा प्रयत्न) कलमांतर्गत अटक केल्याची माहिती वडाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक परशुराम कार्यकर्ते यांनी दिली.



हेही वाचा

पेट्रोल पंपावर मोबाईल वापरासाठी हटकले म्हणून मारहाण!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा