वीजबिल न भरल्याचे मेसेज करून फसवणाऱ्या दोघांना अटक

मुंबई पोलिसांनी झारखंडमधून दोघांना अटक केली.

वीजबिल न भरल्याचे मेसेज करून फसवणाऱ्या दोघांना अटक
SHARES

वीजबिल भरायचे बाकी आहे किंवा अद्ययावत केलेले नाही, असे संदेश पाठवून वीज जोडणी तोडण्याची धमकी देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी झारखंडमधून दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी डझनभर सिमकार्ड हस्तगत केली असून त्यांनी अशा पद्धतीने अनेकांना फसविल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

वांद्रे येथील एका व्यक्तीच्या मोबाइलवर १७ नोव्हेंबरला वीजबिलासंदर्भात एक संदेश आला. यामध्ये वीजबिलाचा भरणा केला नसल्याने रात्री वीज जोडणी तोडण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले होते.

बिल भरले असताना असा संदेश का आला, याबाबत विचारणा करण्यासाठी या व्यक्तीने संदेश आलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. त्याने भरलेले बिल अद्ययावत करण्यासाठी लिंकवर जाऊन १० रुपये पाठविण्यास सांगितले. १० रुपये पाठविण्याच्या प्रयत्नांत संबंधित कथित अधिकाऱ्याने ५५ हजार रुपये परस्पर काढून घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच पोलिस ठाण्यात तक्रार केली. वांद्रे-कुर्ला संकुल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्राम अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे पथकाचे उपनिरीक्षक राजाभाऊ गरड, सूरज जरग, रामपुरे यांचे पथक त्वरित कामाला लागले.

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. ही फसवणूक झारखंड राज्यातून केली जात असल्याचे समजताच पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले.

रांचीमधील दलादिली चौकातील एका घरामध्ये पोलिसांनी छापा टाकला असता सचिन कुमार भरत मंडल आणि संजीत कुमार सीताराम मंडल हे दोघे अनेक सिमकार्डचा वापर करून फसवणूक करत असल्याचे आढळले. पोलिसांनी या दोघांना अटक करून फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारी अनेक सिमकार्ड जप्त केली.



हेही वाचा

Shraddha Murder Case: लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी

श्रद्धाच्या शरीराचे तुकडे बॅगेत घेऊन फिरताना आफताब सीसीटीव्हीत कैद, फोटो व्हायरल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा