वानखेडे स्टेडियमवर रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्याचा अानंद मुंबईकरांनी लुटला. पण हाच फायनलचा सामना यशोधर शेट्टी यांच्या जीवावर बेतला. अंतिम सामना पाहून घरी जात असताना यशोधर शेट्टी (५३) यांना अापले प्राण गमवावे लागले अाहेत. रविवारी मध्यरात्री दहिसर चेकनाका परिसरात ही घटना घडली असून दहिसर पोलिसांनी दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांना अटक केली अाहे.
बोरिवलीत राहणारे यशोधर शेट्टी हे आयपीएलचा अंतिम सामना पाहून आपल्या मित्रांसोबत रिक्षानं घरी परतत होते. सोबत असलेल्या मित्रांना दहिसर चेकनाका इथं सोडून पुढे निघणार इतक्यात मागून एका दुचाकीनं त्यांच्या रिक्षाला धडक दिली. रिक्षाचालक आणि शेट्टी यांनी दुचाकीस्वाराला जाब विचारला असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दुचाकीस्वारानं शेट्टी यांना मारहाण केली. तेवढ्यात गस्तीवर असलेले दहिसर पोलिस तिथं येऊन पोहोचले.
पोलिसांना पाहून दुचाकीवरील दोघांपैकी एकजण पसार झाला तर एकाला पोलिसांनी अटक केली. शेट्टी पोलिसांना तक्रार देत होते, तेवढ्यात त्यांना उलटी झाली. लगेच त्यांना भगवती रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेट्टी यांच्या मित्रांच्या जबाबावरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. साहिल अरोरा आणि भूषण बनसोडे अशी त्या दुचाकीस्वारांची नावं असून दोघेही दारूच्या नशेत होते, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक वसंत पिंगळे यांनी दिली.
हेही वाचा -