मुंबईतल्या विविध बँकांच्या एटीएममधून पैसे काढूनसुद्धा पैसे न मिळाल्याचा कांगावा करून बँकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी अशा प्रकारे मागील ६ महिन्यात तब्बल १५ बँकांना १ कोटी रुपयांना गंडवलं आहे. आरिफ खान (१९), असमत खान (२०) अशी या दोघांची नावे आहेत.
मुंबईतल्या नामांकित बँकातून फेब्रुवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत हे दोघेही पैसे काढायचे. डेबिट कार्डवरुन विविध एटीएम सेंटरमधून पैसे काढूनही बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राकडे पैसे मिळाले नसल्याच्या खोट्या तक्रारी करायचे. अशा प्रकारे या दोघांनी आतापर्यंत शहरातील एटीएम सेंटरमधून एक कोटी रुपये काढले होते. मात्र ही रक्कम एटीएममधून मिळालीच नाही, असा पवित्रा घेत बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राकडे खोट्या तक्रारी करायचे. काही दिवसांपासून अशा तक्रारी नागपाडा पोलिस ठाण्यात वारंवार येत होत्या. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधीत आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच दोन आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी एटीएममधून पैसे मिळाले असतानाही त्यांना पैसे मिळाले नाही, अशी तक्रार करुन त्यांच्याकडील डेबिट कार्ड बँकेत जमा केले. त्यांनी बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याचं तपासात उघडकीस येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -
पुणे आणि नाशिक मार्गावर धावणारी लोकल मुंबईत दाखल
विनयभंगाच्या गुन्ह्यातून गायक अभिजीत भट्टाचार्य निर्दोष