रंगाचा बेरंग झाल्यास महिनाभर तुरुंगात जाल

आदेशाचे उल्लंघन केल्यास अटकेची कारवाई होऊ शकते, असे मुंबई पोलिसांच्या वतीने बजावण्यात आले आहे

रंगाचा बेरंग झाल्यास महिनाभर तुरुंगात जाल
SHARES

होळी, धुळवड आनंदात साजरी करा, मात्र रंगाचा 'बेरंग' केल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. मनाविरुद्ध कुणावर रंग किंवा फुगे फेकण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा, गाणी गाण्यास बंदी लादण्यात आली असून तसे आदेश मुंबई पोलिसांच्यावतीने जारी करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अटकेची कारवाई होऊ शकते, असे मुंबई पोलिसांच्या वतीने बजावण्यात आले आहे.


हेही वाचाः-  चांगलं काम करूनही मनसेला मतदान नाही, याला काय अर्थ आहे? - राज ठाकरे

मुंबईमध्ये होळी आणि धुळवड मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. चाळ, इमारती, गृहनिर्माण सोसायट्या याचबरोबर रस्त्यावर, चौपाट्या तसेच सार्वजनिक ठिकाणी धुळवड साजरी करण्यासाठी गर्दी होते. या उत्साहाला गालबोट लागू नये, जातीय हिंसा वा कायदा आणि सुव्यवस्था स्थितीतील बिघाड टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कुणाच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत तसेच अशा प्रकारची गाणी गाऊ नयेत, पादचारी तसेच इतर कोणावर संमतीविना रंग, पाण्याने किंवा रंगाने भरलेले फुगे टाकू नयेत, प्रतिष्ठा, संस्कृती, नैतिकचे भान राखावे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचाः- करोनाची सेन्सेक्सला लागण, तब्बल २४०० अंकांनी आपटला


 यासंदर्भात तक्रार केल्यास अगर पोलिसांच्या या आदेशाचे उल्लंघन करताना कुणी आढळल्यास भादंवि कलम १८८ अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. हा दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा असून अटक झाल्यास महिनाभराची शिक्षाही होऊ शकते. पोलिसांनी हे आदेश ९ ते १० मार्च या कालावधीसाठी जारी केले आहेत. त्यामुळे होळी, धुळवड साजरी करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याचे भान ठेवा असे आवाहन मुंबई पोलिसांचे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी केले आहे. 


कडेकोट बंदोबस्त

मुंबईत धुळवडी दिवशी कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये, या दृष्टीकोनातून विभागीय पोलिस अधिकारी,अंमलदार, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, मुंबई वाहतूक विभाग आणि १४५० अतिरिक्त पोलिस अधिकारी अंमलदारांसह ४० हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणारआहेत. मुंबईतील महत्वाची ठिकाणे, चौपाट्या, राजकिय नेत्यांचे पुतळे, संवेदनशील ठिकाण, गर्दीची ठिकाण,  माॅल, या ठिकाणी सीसीटिव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. महिलांच्या छेडछाडचा प्रकार घडू नये,या दृष्टीने विशेष पथक स्थापन करण्यात आली आहेत.  


विशेष सूचना

 ० होळी निमित्त झाडे तोडणाऱ्यांवर होऊ शकते कारवाई

० सार्वजनिक ठिकाणी गुलाल आणि रंग उधळणाऱ्यांवर होणार कारवाई

० प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी

० रासायनिक रंग विक्रीवर होणार कारवाई

० ४० हजार पोलिस सुरक्षेच्या दृष्टीने तैनात





 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा