झटपट श्रीमंतीच्या नादात परराज्याच्यातील टोळीने शस्त्राच्या धाकावर बोरिवलीतील एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान मालकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. या टोळीला गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी शर्तीचे प्रयत्नकरून या टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.भरत शर्मा, घेवरचंद फूतरमलजी सुथर, शेहजाद मलिक, शाहिद खान, फैजन कुरेशी, अशी या आरोपींची नावे आहेत. या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी हे चोर ज्या मार्गाने पळून गेले. त्या त्या मार्गावरील शेकडो सीसीटिव्ही तपासून त्यांना अटक केली आहे.
मुंबईच्या कांदिवली परिसरातील आकुर्लीजवळ २२ फेब्रुवारी रोजी प्रामाणिक ज्वेलर्सवर बंदुकीच्या धाकावर घुसले. दुकानमालकाला शस्त्राच्या धाकावर डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी संधी साधून दुकान मालकाने आरडाओरडा केला. आरडा ओरडा ऐकून रस्त्यावरील नागरिक दुकानाबाहेर एकवटले. त्यावेळी एका आरोपीने नागरिकांवर बंदुक धरून त्यांना आत येण्यापासून रोखले. याची माहिती समतानगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत आरोपींनी तेथून पळ काढला होता. या प्रकरणी दुकान मालकाने समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुकानातील सीसीटिव्हीतपासून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फारसे यश आले नाही. त्यामुळे आरोपी ज्या ज्या मार्गावरून मुंबईबाहेर पळ काढला. त्या त्या ठिकाणावरील सीसीटिव्ही तपासून आरोपींचा माघ काढत त्यांना अटक केली. पोलिस तपासात यातील मुख्य आरोपी भरत शर्मा याचे विरार येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. हे चार ही आरोपी सराईत आरोपी असून यांच्यावर या पूर्वी ही अशा गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे या चौघांनी कारागृहातच या ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय इतर दोन ज्वेलर्सची ही या टोळीने रेखी केल्याची माहिती आरोपीनी पोलिसांना दिली. या टोळीकडून पोलिसांनी २ दुचाकी १ बंदुक आणि ३ जिवंत काडतुसे, १ चाॅपर हस्तगत केला आहे. या टोळीवर गुजरात, राजस्थान, कर्नाटक राज्यात ही गुन्ह्यांची नोंद असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.