मुंबई पोलिसांच्या सशस्त्र दलाच्या मुख्यालतून जीवंत काडतुसे गहाळ झाल्याप्रकारणी सहा अमलदारांना निलंबित करण्यात आलं आहे. शनिवारी वरळीच्या सशस्त्र विभागातून तब्बल ५० जीवंत काडतुसे गहाळ झाल्याचं उघड झालं होतं. पण अवघ्या काही काळातच ही काडतुसे मिळाली देखील. या घटनेच्या गंभीरतेकडे बघत वरिष्ठांनी ६ अंमलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
शनिवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास कुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई महेंद्र पाटील तिथे आले. त्यावेळी वरळीच्या सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारासमोर पोलीस शिपाई संकेत माळी यांची गार्ड म्हणून नेमाणूक करण्यात आली होती. पण महेंद्र पाटील यांनी माळी यांची नजर चुकवून त्यांच्या ताब्यातील एसएलआर रायफलचे पन्नास जीवंत काडतुसांनी भरलेली बँडरोल आणि 2 रिकाम्या चार्जर क्लिप घेऊन निघुन गेले. हा प्रकार लक्षात येताच मोठी खळबळ उडाली.
महेंद्र पाटील यांनी काडतुसे आणि चार्जर क्लिप या दादर पोलीस ठाण्यात जमा केल्या खऱ्या. मात्र तोवर प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहचलं होतं.
या प्रकरणी सशत्र पोलीस मुख्यालयात ड्यूटीवर असलेल्या संकेत माळीसह पोलीस शिपाई महेश दुधवडे, राजू पवार, राहुल कदम यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली. तर पोलीस हवालदार विजय हिर्लेकर यांच्यावर प्रशासकीय करवाई करण्यात आली. त्याचबरोबर कुर्ला पोलीस ठाण्याचे महेंद्र पाटील यांच्यावरदेखील करवाई करण्याचे आदेश काढण्यात आले आहे.