मुंबईत जबरी चोऱ्यांसह अन्य गुन्ह्यांचं प्रमाण ५० टक्क्यांनी वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे वाढले असूनही गुन्ह्यांची उकल होण्याचं प्रमाण मात्र २० ते २५ टक्के इतकंच आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी उघडकीस आली आहे.
भर रस्त्यात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भर दिवसा लूटमार होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असून पोलिस गुन्ह्यांना पायबंद घालण्यास अपयशी ठरत आहेत. गुन्हे उकल होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितलं असलं हे प्रमाण मात्र वाढत्या गुन्ह्यांच्या तुलनेत कमीच आहे.
मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने ९४९ कोटी रुपये खर्च करुन ६ हजार कॅमरे २०१६ मध्ये लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा गुन्ह्यांचं प्रमाण घटलेलं नाही. मुंबईत गंभीर गुन्ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना गंभीर गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र चिंताजनक असल्याची धक्कादायक माहिती शकिल अहमद यांनी मागवलेल्या माहितीतून पुढे आली आहे. मुंबईत २०१७ मध्ये एकूण ८५० जबरी चोरीच्या घटनेत ४ कोटी ५७ लाख ८८ हजार ९८३ रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रकमेची चोरी झाली आहे. यामधील फक्त ६७१ गुन्हे उघड झाले आहेत. यामधील २ कोटी ३५ लाख ६६ हजार ७३६ कोटींचा मुद्देमाल मिळाला आहे.
तर २०१८ मध्ये एकूण ९३१ चोरीच्या घटनेत ७ कोटी ४ लाख ४४ हजार ३०० रुपयांची चोरी झाली. यातील फक्त ८२८ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये ४ कोटी ५५ लाख ४०१ इतकी किंमतीचा मुद्देमाल परत मिळाला आहे.
मागील काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता, जानेवारी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ४६७४ जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. यामध्ये ४५ कोटी ६८ लाख ५० हजार ५८२ रुपयांची चोरी झाली आहे. तर पोलिसांनी फक्त १६ कोटी ७५ लाख ४६ हजार २९५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. म्हणजे फक्त ३७ टक्के मुद्देमाल मिळाला आहे.
हेही वाचा -
आमदाराची हरवलेली बॅग २४ तासात शोधली
अंमलीपदार्थ तस्करांवर पहिल्यांदाच 'मकोका' अंतर्गत कारवाई