तस्करी शब्द भारत देशाला नवीन नाही. चंदन तस्कर कूज मुनिस्वामी विरप्पनने दक्षिण भारतात धुमाकुळच घातला होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात अंमली पदार्थ, चंदन आणि इतर वस्तू प्रमाणे प्राण्यांच्या तस्करीच्या प्रमाणात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षभरात ७४५९ पाळीव प्राण्यांची चोरी झाल्याचे गुन्हे देशभरात दाखल झाले असून त्यांची किंमत ४२ कोटीच्या घरात आहे.
महाराष्ट्रात अघोरी विद्येसाठी मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा वापर केला जातो. तर अनेक जण पैसे कमवण्याचे साधन त्यांना बनवतात. तर आयुर्वेदीक औषधांसाठी प्राण्यांचा बळी दिला जात असल्याचे अनेक प्रकार पढे आले आहेत. खवले मांजर, दुर्मीळ मांडूळ साप, अत्यंत विषारी कोब्रा, कासव, दुर्मिळ पक्षी यांचीही तस्करी होतच असते. पोलिसांना समजले तरच छापा पडतो, नाही तर खुलेआम अशा दुर्मीळ वस्तूंची विक्री होतच असते. गतवर्षी ठाण्यात मोठ्या प्रमाणात मांडुळ सापांच्या तस्करीचे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले होते. या तस्करीचे हायकनेक्शन उत्तर प्रदेश असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली होती.
संपूर्ण महाराष्ट्रात या प्राण्याची तस्करी होते. तब्बल चार ते पाच किलो वजनाचे हे मांडूळ असून ते लांबही पाच फूट असते. भारतीय बाजारपेठेत या मांडूळाची किंमत सुमारे ३० ते ३५ लाखांपेक्षा अधिक असते. अंधश्रद्धा, अधोरी कर्मकांड आणि परदेशातही या जातीच्या सापांची तस्करी केली जाते. लाखो रुपयांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. आदिवासी शेतक-यांकडून किरकोळ किमतीत हे मांडूळ किंवा दुतोंडय़ा घेणे आणि शहरात त्याचे लाख रुपये कमवायचे असे या तस्करी करणा-यांचा हा धंदाच असतो. मांडुळ या दुर्मिळ प्राण्याची किंमत बाजारात ४० लाख रुपये आहे. येऊरसारखा निसर्गरम्य आणि वन्यजीवसंपदा असलेला परिसर म्हणून ओळख पावलेले ठाणे शहर गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांच्या तस्करीमुळे कुप्रसिद्ध होऊ लागले आहे. भिवंडी, नवी मुंबई, मुंबई, नाशिक तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या परिसरातील तस्करांनी प्राण्यांच्या तस्करीसाठी आपला मोर्चा ठाण्याकडे वळवल्याचे स्थानिक पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.