यंदा बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी भूगोल असल्यानं अभ्यासक्रमात सर्वेक्षण गरजेचं आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना भूगोलाच्या अभ्यासादरम्यान सर्वेक्षण करावे लागणारे असून, हे सर्वेक्षण मोबाइलच्या एका क्लिकवर शक्य होणार आहे. भूगोलाच्या बारावीच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि आवश्यक गरजा लक्षात घेऊन बालभारतीनं या मोबाइल अॅपची निर्मिती केली आहे.
ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. आतापर्यंत १,५५५ विद्यार्थी, तर ५६७ शिक्षकांनी या अॅपसाठी नोंदणी केली आहे. बालभारती मंडळाकडं आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून १०९९ सर्वेक्षणाचीही नोंद झाली आहे. जे विद्यार्थी अभ्यासक्रमात शिकत आहेत त्याची समाजामध्ये जाऊन चाचपणी सर्वेक्षणाद्वारे करायची आणि जी सांख्यिकी माहिती जमा होईल त्याचा वापर करून विश्लेषण करायचे, ही कार्यपद्धती सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असते.
याआधी हे सर्वेक्षण घरोघरी जाऊन पेन, वहीच्या साहाय्यानं केलं जात होतं. मात्र, आता त्यासाठी मोबाइल अॅपचा वापर होणार असून, बालभारती संचालकांची याला मान्यता मिळाल्यानं भूगोलाच्या शिक्षकांना अॅपच्या लिंक पाठविल्या असून, त्यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ १५ घरांचे सर्वेक्षण करायचे आहे. ते ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण करतील त्यांच्यासोबत त्यांना सेल्फी काढायचा आहे. यामुळे त्या ठिकाणचे जिओ लोकेशन टॅग होऊन तेथील नकाशाचा डेटा तयार होईल.
अॅपमध्ये जिओ टीचर हे एक शिक्षकांसाठी तर दुसरे जिओ सर्वेक्षण हे विद्यार्थ्यांसाठी अशी दोन प्रकारची अॅप बनविली गेली आहेत. शिक्षकांनी शाळेचा यू डायस क्रमांक आणि स्वत:चा मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर त्यांना जो कोड मिळेल, तो त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. विद्यार्थी तो त्यांच्या मोबाइल अॅपमध्ये टाकतील, ज्यामुळे शिक्षक हे विद्यार्थ्यांशी आपोआप कनेक्ट होतील. यामुळे विद्यार्थी कुठले सर्वेक्षण करीत आहे, किती बाकी आहे, याची इत्थंभूत माहिती शिक्षकांना मिळेल व मूल्यांकन करणे सोपे होईल.
मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताच
दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम