मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये जवळपास ९ टक्के म्हणजेच ७८१ पदे रिक्त असल्याचं माहिती अधिकार (आरटीआय) अंर्तगत समोर आलं आहे. असं असतानाही महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांचं प्रमाण अतिरिक्त असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच या आकडेवारीवरून बऱ्याच शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) नुसार विद्यार्थी व शिक्षकांचं प्रमाण योग्य ठेवलं जात नसल्याचंही पुढं आलं आहे.
समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीचे श्याम सोनार यांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती मागवली होती. त्यांना सप्टेंबर २०१७ पर्यंतची शिक्षकांची आकडेवारी देण्यात आली असून महापालिकेतील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ८९०० शिक्षकांची आवश्यकता आहे. सध्या महापालिकेच्या सेवेत अवघे ८,११९ शिक्षक काम करत आहेत. म्हणजेच महापालिकेच्या शाळेत जवळपास ७८१ पदे रिक्त आहेत.
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) नुसार देशातील बालकांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळणं अपेक्षित असताना देखील पालिकेच्या काही शाळांमध्ये दुसरी व तिसरीचे वर्ग एकत्रच भरविण्यात येतात. अशी धक्कादायक माहितीही सोनार यांनी दिली.
सध्या आपल्याकडे बरेच पदवी व पदवीकाधारक शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. असं असताना सरकारतर्फे शिक्षकांची भरती न करता अतिरिक्त शिक्षक असल्याचं भासवलं जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा-
मुंबई विद्यापीठाच्या दर्जाची मुख्यंमत्र्यांना काळजी!
नववी नापासांसाठी खुशखबर! फेरपरीक्षेची मिळणार संधी!