ऑनलाइन पेपर तपासणीच्या मोठ्या सावळ्या गोंधळानंतर अखेर पेपर तपासणीसाठी चार दिवस विद्यापीठाशी संबंधित सर्व कॉलेजेस बंदच ठेवण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर ओढवली. त्यामुळे 23 जुलै ते 27 जुलै हे चार दिवस कॉलेजमधली सर्व कामं बाजूला ठेऊन फक्त पेपर तपासणी करण्याचं एकमेव टास्क प्राध्यापकांसमोर असेल. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून त्याबद्दल कुलगुरु आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी केली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली.
खरं म्हणजे शिक्षणमंत्री आणि VC ह्यांना आपल खातं आणि विद्यापीठ समजलंय का? एवढा घोळ का? अन्यथा राजीनामा देतील का?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 24, 2017
विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 13 जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावण्याची तंबी कुलगुरुंना दिली होती. त्यामुळे लागलीच कामाला लागत पेपर तपासणीचे काम सुरु करण्यात आले. त्यासाठी ऐन वेळी नागपूर विद्यापीठाचीही मदत घेण्यात आली. पण अजूनही 6 लाख उत्तरपत्रिका तपासण्याचं मोठं काम शिल्लक आहे. त्यामुळे अखेर चार दिवस कॉलेज बंद ठेऊन हे काम पूर्ण करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.
एकीकडे ऑनलाईन अॅडमिशनमध्येच अनेक त्रुटी समोर आल्या असताना ऑनलाईन असेसमेंटचा घाट का घातला? आता निकाल वेळेवर लावण्यासाठी चार दिवस कॉलेजच बंद ठेवणे हा प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकाराला जबाबदार कुलगुरु आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख
मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडले असताना इतर विद्यापीठांचे पद्व्युत्तर प्रवेश मात्र पूर्ण होतायत. त्यामुळे इत रविद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.
अश्या या ढिसाळ कारभारामध्ये आता मुंबई विद्यापीठात Pro- VC, रजिस्ट्रार आदी पदे रिक्त आहेत, परीक्षा नियंत्रक हे देखील प्रभारी आहेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 24, 2017
ऑनलाईन असेसमेंटच्या टेंडर प्रक्रियेवरही यावेळी आदित्य ठाकरेंनी शंका उपस्थित केली. एवढा सगळा गोंधळ सुरु असल्यामुळे नक्की ऑनलाईन असेसमेंटचं टेंडर कोणत्या कंपनीला दिलेलं आहे? हे टेंडर कोणत्या आधारावर दिलं गेलं? असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच या प्रकाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.
आदित्य ठाकरे यांच्या मागणीची खिल्ली
आपल्या राजीनाम्याच्या मागणीची राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खिल्ली उडवली आहे.
युवासेनाप्रमुख यांनी राजीनामा मागितला आहेृ. कुलगुरू एक आहेत, त्यांचा मागितला असावा. बहुदा उच्च -तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा मागितला असावा. कधीकधी संघटनेचं काम करताना अभ्यास कमी पडतो मान्य आहे, कुलसचिव यांची बदली शिक्षण विभागाने केली नसून केंद्राच्या अल्पसंख्यांक विभागाने केली आहे. फेरतपासणी शुक्ल कमी करण्याबाबत मुद्दा स्वागतार्ह आहे, यावर विचार करू. चर्चा करू.
विनोद तावडे
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या मागणीवर काँग्रेस नेते निलेश राणे यांनी त्वरीत तोंडसुख घेतलं आहे. "मग मुंबईतील रस्ते घोटाळ्यांसाठी महापौरांनी राजीनामा दिला पाहिजे" असं ट्विट त्यांनी केलं आहे.
मग मुंबईतील रस्ते घोटाळ्यासाठी, मुंबईतील आरोग्य सेवेसाठी महापौरांनी राजीनामा दिला पाहिजे https://t.co/Wz6FQ93PpC
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 24, 2017
हेही वाचा
पेपर तपासणीसाठी चार दिवस कॉलेज बंद
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)