मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये चालविण्यात येणाऱ्या बालवाडीच्या शिक्षकांचे मानधन अखेर वाढणार आहे. बालवाडीच्या शिक्षकांना सध्या ३ हजार रुपये एवढे मानधन मिळत असून वाढत्या महागाईपुढे ही रक्कम फारच कमी असल्यामुळे यामध्ये आणखी २ हजार रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना आता ५ हजार रुपयांचे मानधन तर मदतनिसांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात येणार आहे.
महापालिका शाळांमध्ये ५०४ बालवाड्यांचे वर्ग सुरु आहेत. सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या वतीने खासगी संस्थांच्या मदतीने विविध भाषिक एकूण ५०४ बालवाडी वर्ग महापालिका शाळांमध्ये चालवण्यात येत आहेत. या शाळांमधील बालवाडीत शिकवणाऱ्या शिक्षकांना सुरुवातीला प्रति महिना १५०० रुपये एवढे मानधन होते, तर मदतनिसांचे मानधन ७५० रुपये एवढे होते. परंतु सन २००९-१०मध्ये या मानधनात वाढ करून शिक्षिकांचे मानधन २ हजार रुपये तर मदतनिसांचे मानधन १ हजार रुपये एवढे प्रति महिना करण्यात आले. त्यानंतर सन २०१४-१५मध्ये या शिक्षक व मदतनिसांचे मानधन प्रति महिना अनुक्रमे ३ हजार व १५०० रुपये एवढे करण्यात आले होते.
सध्या बालवाडीच्या वर्गातील शिक्षक व मदतनिसांना देण्यात येणारे मानधन अल्प असल्यामुळे तसेच सध्या वाढत्या महागाईमुळे आणि समव्यावसायिकांना मिळणारे मानधन याची तुलना करता २०१७-१८ मध्ये बालवाडीच्या शिक्षकांना प्रति महिना ५ हजार रुपये तर मदतनिसांना ३ हजार एवढे मानधन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या मानधनवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला ठेवण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले. इतर खर्च म्हणून देण्यात येणारे २०० रुपये कायम राहणार आहेत. यात कोणतीही वाढ करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)