Advertisement

शाळांकडून होतेय फी भरण्याची सक्ती? तर 'हा' आदेश वाचाच..

सध्या देशभरात लाॅकडाऊन सुरू असताना देखील अनेक शाळा पालक आणि विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागू (school fee) लागल्या आहेत.

शाळांकडून होतेय फी भरण्याची सक्ती? तर 'हा' आदेश वाचाच..
SHARES

सध्या देशभरात लाॅकडाऊन सुरू असताना देखील अनेक शाळा पालक आणि विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागू (school fee) लागल्या आहेत. यासंदर्भातील असंख्य तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्यानंतर अखेर विभागाने सर्व मंडळांच्या इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांसाठी सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये लाॅकडाऊनच्या (lockdown) काळात कुठल्याही शाळेने विद्यार्थी/पालकांवर फी भरण्याची सक्ती करू नये, असं स्पष्टपणे बजावण्यात आलं आहे.

यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात (notification from education department) नमूद करण्यात आलं आहे की, कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात देखील काही शैक्षणिक संस्था/शाळा, विद्यार्थी/पालकांना फी भरण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करू नये. लाॅकडाऊन संपल्यानंतर फी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- यंदाच्या वर्षापासून सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं सक्तीचं

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील कलम २१ अन्वये प्राप्त अधिकारान्वये तसंच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २६(i) व (I) अन्वये प्राप्त अधिकारान्वये शासनाने शाळांना पुढील निर्देश दिले आहेत.

  • त्यानुसार पालकांच्या सोईच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० व २०२०-२१ मधील देय/ शिल्लक फी वार्षिक/एकदाच न घेता मासिक/त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा.
  • शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोणतीही फी वाढ  करू नये.
  • शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी (EPTA) समितीमध्ये ठराव करून त्यामध्ये योग्य प्रमाणात फी कमी करावी.
  • लाॅकडाऊन काळात गैरसोय टाळण्यासाठी पालकांना आॅनलाईन फी भरण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.

वरील सर्व आदेश हे सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमाच्या व पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असतील, असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा