अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरी सुरू असून अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार असल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. ११वी प्रवेशाची एफसीएफएस फेरी १८ ऑक्टोबर, सोमवारी संपणार होती मात्र २१ ऑक्टोबरपर्यंत शिक्षण संचालनालयाकडून या फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबतच पत्रक अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. अकरावी प्रवेशाच्या फेरीदरम्यान अनेक सुट्या आल्यानं एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीनं प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यानुसार आता २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. या वाढीव मुदतीच्या काळात दहावी उत्तीर्ण आणि एटीकेटी विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश कधी होणार, त्यांना संधी केव्हा दिली जाणार, असे प्रश्न विद्यार्थी पालकांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, पुरवणी परीक्षांचा निकाल लागल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.