विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे, म्हणून मुंबई विद्यापीठ परीक्षा भवनाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा प्रक्रिया आणि इतर गोष्टीमुळे संशय वाढेल. त्याशिवाय परीक्षा भवन चालवता येत नसेल तर बरखास्त करून टाका अन्यथा पुढील काळात हिंसक आंदोलन करण्यात येईल.
अॅड. अमोल मातेले, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार गेल्या कित्येक वर्षांपासून चव्हाट्यावर येत आहे. या कारणामुळे परीक्षा विभाग चालवता येत नसेल तर टाळे लावा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला काही दिवसांपूर्वी सुनावलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेनं परीक्षा विभागाबाहेर 'टाळे लावा' केलं होतं. आता विद्यापीठाच्या परीक्षा भवनाची न्यायालयीन चौकशी करण्याबाबतचं परीपत्रक राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मंगळवारी दिलं आहे.
आता पुर्नमूल्यांकन गोंधळ
मुंबई विद्यापीठात परीक्षा वेळापत्रक गोंधळ, निकाल गोंधळ सुरू असताना आता विद्यापीठात पुर्नमूल्यांकन गोंधळ सुरू झाला आहे. गेल्यावर्षी विद्यापीठातील ९७ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केलं होतं. त्यापैकी ३५ हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तसंच गेल्या वर्षी निकाल लागल्यानंतर जवळपास ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केला होता. हा आकडा विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा असून यावरून विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरून विश्वास कमी झाल्याचं दर्शवत आहे. यांसह विविध कारणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी ‘टाळे लावा’ आंदोलन केलं होतं.
सर्व विद्यार्थ्यांचं 'याकडे' लक्ष
काही दिवसांपूर्वी रिद्धी परब या टी. वाय. बीकॉममध्ये शिकणाऱ्या मुलीला पास असूनही नापास शेरा देण्यात आला होता. नापास झाल्यानं खचलेल्या रिद्धीनं आत्महत्या करून जीवन संपवलं होतं. परंतु, पुनर्मूल्यांकनात ती उत्तीर्ण असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये रिद्धीच्या पालकांची भेट घेत परब कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं कोरड सांत्वन केलं होतं.
यात विद्यापीठ प्रशासनाची चूक असूनही रिद्धीच्या पालकांना आतापर्यंत कोणतीही शासकीय मदत प्राप्त झाली नाही. त्यामुळे विद्यापीठानं लवकरात लवकर परब कुटूंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. यांसही इतर काही महत्त्वाच्या विषयांबाबतच निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलं आहे. त्यामुळे यासर्व विषयांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे काय भूमिका घेणार? याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.