शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असं निवेदन अनेक वेळा देण्यात आलं आहे. पण तरीही केंद्रनिहाय अधिकारीपदाची (बीएलओ) कामं शिक्षकवर्गाला दिली जातात. त्यातच आता छायाचित्र मतदार याद्यांचं काम म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईतील शिक्षकांना घरोघरी जाऊन मोबाईल अॅपद्वारे माहिती गोळा करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे शिक्षकांची ही अशैक्षणिक कामे तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुंबई उत्तर विभागातील शिक्षकांना बीएलओ म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कामे देण्यात आली आहेत. त्याअंतर्गत शिक्षकांना छायाचित्र मतदार याद्यांचे काम, मतदार याद्या प्रसिद्ध करणे, मतदारांचे दावे हरकती स्वीकारणे, पुरवणी मतदार यादी तयार करणे आणि घरोघरी जाऊन मोबाईल अॅपद्वारे माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आता शिक्षकांनी शिकवायचं की अशैक्षणिक कामं करायची? असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. दहावीचा अभ्यासक्रम, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहली असे उपक्रम सध्या शाळांमध्ये सुरू आहेत. त्यातच अशा अशैक्षणिक कामाला जुंपण्यात आल्याने या उपक्रमांवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार यात शंका नाही.
शिक्षकांना शिकवण्यासोबतच अनेक ऑनलाईन कामाने बेजार केले असून आता अजून एका अशैक्षणिक कामाची भर पडली आहे. एकीकडे राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत शाळांना प्रगत करत त्यांना ए ग्रेडमध्ये आणण्याबाबत दबाव वाढत असून अशा अशैक्षणिक कामांमुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला खीळ बसणार असल्याची भीतीही अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली असून तातडीने बीएलोची कामं रद्द करण्याची मागणी केली आहे.
प्रत्यक्ष निवडणूक, दशवार्षिक जनगणना आणि आपत्ती व्यवस्थापन ही तीन कामं वगळता अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत, असे 'राईट टू एज्युकेशन अॅक्ट'मध्ये सांगितल्यानंतरही या कायद्याचे उल्लंघन निवडणूक अधिकारी करत आहेत.
अनिल बोरनारे, शिक्षक परिषद