'तब्बल ११ हजार गहाळ उतत्रपत्रिकांचे निकाल बाकी असताना, सर्व निकाल जाहीर केले असे विद्यापीठाने सांगितले. विद्यापीठ धादांत खोटं बोलत आहे. त्या हरवलेल्या ११ हजार उत्तरपत्रिकांच्या गुणांचे काय?' असा सवाल करत माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी विद्यापीठाच्या कामावर ताशेरे ओढले.
ऑनलाईन असेसमेंटला माझा विरोध नाही, मात्र यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांचे मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन असेसमेंटची पद्धत नको. ऑनलाईन असेसमेंट ज्या पद्धतीने राबवली जातेय, ती चुकीची आहे. त्याचप्रमाणे ज्या मेरीट ट्रॅक कंपनीमुळे हा गोंधळ झाला, त्याच कंपनीला पुन्हा काम देणे चुकीचे आहे, असे मुणगेकर यावेळी म्हणाले. कंपनीला ज्या १० सूचना दिल्या आहेत. त्या लोकांसमोर आणाव्यात, अशी मागणीही मुणगेकरांनी केली.
ज्या विद्यमान कुलगुरूंनी विद्यापीठाच्या निकालांची वाट लावली आहे, त्या कुलगुरूंना त्वरीत हटवले पाहीजे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा कलम ११(१४)(इ) प्रमाणे कुलगुरूंना पदावरून दूर करू शकता येते. त्यासाठी त्वरीत कुलपतींनी शोध समिती नियुक्त करावी आणि दोन महिन्यात नवीन कुलगुरूंची नेमणूक करावी. कुलगुरूंबरोबरच विद्यापीठातील रिक्त जागा कायमस्वरूपी भराव्यात. रजिस्ट्रार, परीक्षा नियंत्रक या जागा अद्याप रिक्त आहेत, असे मुणगेकर म्हणाले.
ज्या ११ हजार उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना सरासरी गुण देणे हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे. सरासरी गुण नेमके कोणत्या पद्धतीने दिले जाणार आहेत? याची माहिती उघड करावी. सरासरी गुण देण्याची वेळ विद्यापीठावर का आली? असा सवालही त्यांनी विचारला.
८०० संलग्न कॉलेज आणि सात लाख विद्यार्थी आणि १२०० परीक्षा यांचे व्यवस्थापन करणे विद्यापीठाला कठीण जात आहे. यासाठी माजी कुलगुरूंनी यावर पर्याय सुचवले आहेत.
हेही वाचा