महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भाषा विषयांचे अंतर्गत गुण रद्द करुन १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय मार्च २०१९ पासून घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे २० गुण काढून घेतल्याने विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्यानं हे गुण मिळविताना विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे. मराठी विषयात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून देण्याचा निर्धार अाता शिक्षकांनी केला अाहे. मराठीच्या गुणवत्ता वाढीसाठी मुंबईतील ३०० शाळांमधील शिक्षक एकवटले अाहेत.
महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या मुंबई विभागाने मराठी विषय शिक्षकांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू केले अाहेत. सोमवारी १७ डिसेंबरपासून या मार्गदर्शन वर्गाची सुरुवात झाली. घाटकोपर येथील विद्याभवन हायस्कुलमध्ये १५० शाळांमधील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं. तर मंगळवारी खार येथील अनुयोग विद्यालयात १५० शाळांमधील शिक्षकांना अध्यापक संघातील शिक्षक विजयकुमार लांडगे यांनी मार्गदर्शन केलं.
या वर्गात दहावीच्या पाठ्यपुस्तकातील पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरातलेखन, बातमीलेखन, कथालेखन, लेखन कौशल्य, रसग्रहण व रुपककथेचे स्वरूप शिक्षकांना समजावून सांगण्यात येत आहे. त्याशिवाय औपचारिक व अनौपचारिक पत्रांमधील फरक, सारांश लेखनातील महत्वाचे मुद्दे, जाहिरात लेखन करताना विचारात घ्यायच्या सूचना, बातमीलेखनाचे तंत्रे, कथालेखनाचे प्रकार, रसग्रहण, निबंधलेखन यासह अन्य मुद्यांवर शिक्षकांना मार्गदर्शन करून शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे. या मार्गदर्शनपर वर्गात मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे, अनुयोग विद्यालयाचे संस्थापक सतिशचंद्र चिंदरकर, मनीषा घेवडे,शिक्षण उपनिरीक्षक संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते.
मराठीच्या गुणवत्ता वाढीसाठी मुंबईतील ३०० शाळांमधील शिक्षक एकवटले अाहेत. सर्व शिक्षकांनी अध्यापन करताना विविध संदर्भांचा आधार घ्यायला हवा त्यासाठी शिक्षकांनी अधिकाधिक संदर्भ पुस्तके वाचायला हवी व अपडेट राहायला हव.
- अनिल बोरनारे, अध्यक्ष, मुंबई मराठी अध्यापक संघ
हेही वाचा -
टेकफेस्टनंतरही सुरू राहणार आयआयटीत सोलार चाय ठेला