अकरावी प्रवेशाचे नियम अचानक बदलत असल्यानं विद्यार्थी आणि पालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकरावीच्या पहिल्या तीन फेरीत प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीसाठी कॉलेजांचा पसंतीक्रम भरता येईल अशी सूचना शिक्षण उपसंचालकांनी केली होती. पण अचानक हा नियम बदलल्यामुळं प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आयडीच ब्लॉक करण्यात आले आहेत. यामुळं अकरावी प्रवेशप्रक्रियेत पुन्हा नवा गोंधळ निर्माण झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
अकरावीच्या चौथ्या गुणवत्ता यादीसाठी ८० हजाराहून जास्त जागा उपलब्ध असून अल्पसंख्याक कॉलेजात ५० हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. या सर्व जागांसाठीची प्रवेशप्रक्रिया शुक्रवारी ३ ऑगस्ट रोजी अर्ज भरता येतील असं वेळापत्रकात नमूद करण्यात आलं होतं. परंतु या विद्यार्थ्यांचे आयडी ब्लॉक करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीसाठी अर्ज भरता आला नाही. यामुळं अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
याविरोधात संतापलेल्या पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नी रोड येथं धाव घेतली. त्यानंतर शनिवारी ४ ऑगस्टला विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. अकरावी प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी ७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची शनिवारी ४ ऑगस्टपर्यंत शेवटची संधी आहे.
हेही वाचा-
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा ४ ऑक्टोबरपासून