Advertisement

पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी होणार, वर्षा गायकवाड यांची घोषणा

गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी होणार, वर्षा गायकवाड यांची घोषणा
SHARES

गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. राज्यातदेखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती.

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीनं सुरू झालं आहे. ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक आणि पालक संघटनेनं केलेल्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतचा 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.



हेही वाचा

Maharashtra FYJC CET 2021: अकरावी सीईटीच्या अर्ज नोंदणीला सुरूवात

दोन वर्षांनी होणार शिक्षक पात्रता परीक्षा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा