आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसंच त्यांना सीबीएसई, आयसीएससी बोर्डातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुढे जाता यावं या हेतूने राज्य सरकार लवकरच राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) व कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झॅमिनेशन (आयसीएससी) या बोर्डाशी टक्कर देण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषण अद्याप झालेली नसून लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे याची घोषणा करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकवण्यात येणारा अभ्याक्रम काही प्रमाणात सोपा असतो, त्या तुलनेत सीबीएसई व आयसीएससीच्या बोर्डाचा अभ्याक्रम कठीण असतो. असं असल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विद्यार्थी स्पर्धात्मक युगात कमी पडत असल्याचं वारंवार दिसून येत असल्याचं शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
त्यामुळेच राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाची पातळी वाढवण्यात येणार आहे.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून प्रायोगिक तत्वावर राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या १३ शाळाही सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येतील. तसंच काही शाळांना आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमात सामावून घेतले जाईल.
- विनोद तावडे, शिक्षण मंत्री
हेही वाचा-
महाराष्ट्रातील प्रगत आणि डिजिटल शाळा झाल्या दुप्पट
२३१ अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचं भवितव्य काय?