Advertisement

मुंबई युनिवर्सिटीचा विद्यार्थ्यांना दिलासा, शुल्क कमी करण्याचे कॉलेजेसना निर्देश

कोरोनाकाळात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे शुल्क भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मळाला आहे.

मुंबई युनिवर्सिटीचा विद्यार्थ्यांना दिलासा, शुल्क कमी करण्याचे कॉलेजेसना निर्देश
SHARES

कोरोनाकाळात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे शुल्क भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मळाला आहे. विद्यापीठानं कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शुल्कात मोठी कपात करण्याचे निर्देश गुरुवारी दिले.

यामुळे सरासरी ३० टक्के शुल्ककपात होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर या काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले तर काहींची वेतनकपात झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुल्ककपातीची घोषणा केली होती. यानुसार सर्व कुलगुरूंची ३० जूनला बैठक पार पडली होती.

यानंतर विद्यापीठांनी एक समिती स्थापन करून त्यांच्या शिफारसीनुसार शुल्ककपात निश्चित केली. विद्यापीठाशी संलग्न कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शुल्कात कपात सुचवण्यात आली आहे.

यानुसार करोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील अथवा दोन्ही पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. याचबरोबर सध्याची परिस्थिती लक्षात घेता इतर विद्यार्थ्यांसाठीही शुल्ककपात जाहीर करण्यात आली आहे.

ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना, अभ्यासेतर उपक्रमांचे शुल्क यामध्ये ५० टक्के कपात केली आहे. तर विद्यापीठात जमा होणाऱ्या परीक्षा शुल्क आणि विकास निधी यामध्ये २५ टक्के कपात करण्यात आली आहे. याचबरोबर उद्योग भेट शुल्क, विद्यार्थी विकास निधी, ग्रंथालय व प्रयोगशाळा अनामत रक्कम आणि कॉशन शुल्क पूर्णत: माफ करण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहे.

ज्या कॉलेजांमध्ये नियतकालिक प्रसिद्ध केले जाते, त्याचे शुल्कही न आकारण्याबाबत यामध्ये स्पष्ट करण्यात आले तर जे कॉलेज ऑनलाइन नियतकालिक प्रसिद्ध करतात त्यांना २५ टक्के शुल्क घेण्यास सांगण्यात आले आहे. ही शुल्क कपात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षासाठी लागू असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळिराम गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.



हेही वाचा

इयत्ता १ली ते ८वीसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम

परदेशात शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती; ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा