समायोजन होऊनही सेवेत रूजू न होणाऱ्या शिक्षकांचं वेतन बंद करण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण विभागाद्वारे घेण्यात आला आहे. त्याशिवाय या अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करून न घेणाऱ्या संस्थांमधील पद रद्द करण्यात येणार असल्याचंही शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी जाहीर केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा समायोजनाचा प्रश्न रखडलेला आहे. तर काही शाळांत पटसंख्या घटल्यानं अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं समायोजन जवळच्या शाळांमध्ये करण्यात येतं. त्यानुसार काही शासकीय शाळांतील शिक्षकांचं समायोजन खासगी शाळेत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यानुसार शिक्षकांचं समायोजन करण्यात आलं असूनही अनेक शिक्षक या शाळांत रुजू होत नसल्याचं समोर आलं आहे. तसंच काही ठिकाणी शिक्षकांना रूजू करण्यात येत नाही.
समायोजनाच्या या प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या शिक्षक आणि संस्थांवर कारवाई करण्यात येणार असून जे शिक्षक दिलेल्या शाळेत रुजू होणार नाहीत त्यांचं वेतन थांबवण्यात येणार आहेत. तसंच त्या संस्थांमधील पदं रद्द करण्यात येणार असल्याची सूचना शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार ही प्रक्रिया ऑनलाईन घेण्यात येत होती, मात्र ऑनलाईन प्रक्रियेत माहिती भरताना अनेक शिक्षकांना अडचणी येत असल्यानं ती पुन्हा ऑफलाईन स्वरुपात करण्यात येणार आहे. तसंच ज्या शाळेमध्ये ज्या विषयाच्या शिक्षकांची जागा रिक्त आहे, त्या विषयाच्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येणार आहे.
परंतु, विषयानुसार जागा उपलब्ध नसल्यास विषय कोणताही असल्यास शिक्षकांना शाळेत रूजू व्हावंच लागणार असून इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय वगळता शिक्षकांना राहिलेला कोणताही विषय शिकवण्याची वेळ समायोजित शिक्षकांवर येणार आहे.