मुंबईतील पालकांना लवकरच पावसाळ्याच्या दिवसात पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी लागू शकते. कारण काही स्कूल बस ऑपरेटर पावसाळ्यात वाहतूक करण्यास नकार देऊ शकतात.
अनेकांचा दावा आहे की, नवीन बसेसमध्ये सेन्सर आहेत आणि या रस्त्यांवर पाणी साचल्याने लहान मुलांना घेऊन जाणे धोक्याचे ठरू शकते. तसेच पाण्यामुळे वारंवार बसेसमध्ये बिघाड होत आहे.
स्कूल बस ओनर्स असोसिएशन (SBOA) चे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले, “बसमधील नवीन सेन्सर्स मुसळधार पावसात काम करू शकत नाहीत कारण त्यांच्या इंजिनला पाण्याचा स्पर्श होताच ते खराब होतील. काही भागात पाणी साचल्याने चालकांना मोठे खड्डेही कळत नाहीत. त्यामुळे लहान मुलांसह बस या खड्ड्यांमध्ये अडकल्या आहेत.”
ते पुढे म्हणाले की, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा मिळाल्यास बसेस धावणार की नाही हे विचारण्याची जबाबदारी शाळेची आहे.
“जुन्या बसेसच्या तुलनेत या बसेसच्या जास्त किमतीमुळे, पावसाळ्यात बसेसचा देखभालीचा खर्च इतर दिवसांच्या तुलनेत चारपट जास्त असतो. तसेच, यामुळे मुलांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण होतो,” असेही ते म्हणाले.
गर्ग पुढे म्हणाले, “आम्ही पालिकेच्या पोर्टलवर रस्त्यांच्या समस्येबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु कोणतीच पावलं उचलली जात नाहीत. ”
पवार पब्लिक स्कूल भांडुपच्या मुख्याध्यापिका सुमा दास यांनी सांगितले की त्यांच्या बस कॉन्ट्रॅक्टरने त्यांना अद्याप अशा कोणत्याही निर्णयाची माहिती दिली नाही. “विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. जरी अंदाज दोन दिवसांपूर्वी जारी केला असला तरीही बस कंत्राटदारांनी आम्हाला सतर्क करायला हवे होते.
बोरिवली पश्चिम येथील ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अनघा प्रभू म्हणाल्या, “खड्ड्यांसाठी पालिकेला जबाबदार धरले पाहिजे. मुसळधार पाऊस नसतानाही पाणी साचते. तथापि, अशा दिवशी बससेवा बंद करणे अयोग्य ठरेल कारण त्याचा शाळा आणि विद्यार्थ्यांवर लक्षणीय परिणाम होईल.”
भांडुपमधील पवार पब्लिक स्कूलमधील एका पालकाने सांगितले की, बस मालकही असहाय्य असू शकतात. “मुसळधार पावसावर उपाय नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास बसमालकांना जबाबदार धरले जाते. सेवा नाकारण्यामागे त्यांची पूर्णपणे चूक नाही.”
हेही वाचा