कोरोना संसर्गामुळे (coronavirus) राज्यातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून गेलेलं असताना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा केव्हा होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा कशा रितीने घेण्यात येतील याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी सांगितलं की, "१० वी बोर्डाची परीक्षा १५ एप्रिलनंतर आणि १२ ची परीक्षा १ मे नंतर घेण्यासंदर्भात विचारविनियम सुरू आहे. आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. लवकरच निर्णय घेऊ."
हेही वाचा- CBSE च्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे पाहता शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपवला होता. त्यानुसार मुंबई, ठाणे इ. महापालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता नवीन वर्षातही आणखी १५ दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.
We are considering holding HSC exams after April 15 and SSC exams after May 1. State is consulting health officials on the possibility of reopening schools for standard 5th to 8th. A decision will soon be taken.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 3, 2021
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने काही जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील काही शहरांतील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत.
मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंख यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. तेव्हापासून राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा केव्हा होणार असे प्रश्न विद्यार्थी-पालक विचारू लागले आहेत.