दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे १०० टक्के गुण मिळाल्याचं कानावर येतं आणि अनेकांचे डोळे विस्फारतात. त्यानंतर 'आमच्या काळी नव्हते हो एवढे टक्के मिळत' असा टिपिकल डायलॉगही वडिलधाऱ्यांकडून ऐकायला मिळतो. विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळण्यामागचं मूळ कारणं म्हणजे शाळेकडून दिले जाणारे अतिरीक्त गुण. मात्र आता या वर्षापासून शाळेकडून दिल्या जाणाऱ्या या अतिरीक्त गुणांची खैरात थांबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
आता कला आणि क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले जाणार नाहीत. तर विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर हे गुण देण्यात येतील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागातर्फे कला, क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अतिरीक्त गुण दिले जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळू लागले. मात्र या गुणांचा उपयोग टक्केवारी वाढवण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या अतिरीक्त गुणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे विद्यार्थी १० वीची परीक्षा गंभीरपणे घेतील. यामुळे अतिरीक्त गुणांची खैरात बंद होईल. हा निर्णय सकारात्मकच आहे. विद्यार्थ्यांना मेहनत करून मिळवलेल्या यशाचं महत्त्व समजेेल.
- विनया लिमये, निवृत्त शिक्षीका