राज्यातील कोरोना विषाणू प्रादूर्भावाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर यासंदर्भातील अधिकृत घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्यानुसार येत्या २७ जानेवारी २०२१ पासून विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
यासंदर्भात अधिक माहिती देताना वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी सांगितलं की, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून इयत्ता ५ वी ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यासंदर्भात, मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली होती. ही विनंती मान्य करत त्यांनी येत्या २७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील ५ वी ते ८ इयत्तेसाठी शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा- महाविद्यालयांतील ७५ टक्के प्रवेश पूर्ण; आठवडाभरात ११वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता
In continuation of our plan to reopen schools in a phase wise manner, today I discussed my department's proposal to reopen schools for std 5th-8th from January 27 onwards with @OfficeofUT ji, he was kind enough to approve it. pic.twitter.com/rLie35FsWp
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 15, 2021
शाळा सुरू करत असताना कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करणे, स्थानिक प्रशासनाने या तयारीची जबाबदारी घेणे, पालकांची संमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट या महत्त्वाच्या गोष्टी आणि एसओपी आम्ही लवकरच निर्गमित करू. कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते, असं आश्वासन देखील वर्षा गायकवाड यांनी दिलं.
राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे बंद आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकार शाळा, महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्यास तयार नाही. राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वीच ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील कोविडची स्थिती लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेण्यास सांगितलं होतं.
(standard 5 to 8 school will reopen in maharashtra from 27th january 2021 says varsha gaikwad)