रखडलेला निकालाच्या समस्येवर संयमाचा बांध तुटलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठात आंदोलन करत 'सेव्ह मुंबई युनिव्हर्सिटी'चा नारा दिला. विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी यावेळी उपस्थित हाेते. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांना भेटण्याची मागणी करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली.
रखडलेले पुनर्मुल्यांकनाचे निकाल लवकरात लवकर लागावेत यासाठी विद्यार्थ्यांनी या अगोदरही अनेकदा आंदोलने केली. पण आश्वासनाखेरीज विद्यार्थ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लॉ काऊन्सिल, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, काँग्रेस विद्यार्थी संघटना, प्रहार विद्यार्थी संघटना या विद्यार्थी संघटनांना सोबत घेत आंदोलन केलं.
वैयक्तिक कारणामुळे कुलगुरू रजेवर असल्याने उपकुलगुरु धीरेन पटेल, परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे आणि रजिस्ट्रार दीपक कांबळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. पण त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांचं समाधान झालं नाही. बुधवारी विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये कुलगुरूंची भेट घेण्याचा निर्णय विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. या आधी अनेकवेळा कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची भेट घ्यायचे टाळले आहे.
विद्यापीठात सुरु असलेल्या गलस्थान कारभार मी अनेकवेळा टीका केली आहे. मेरिट ट्रॅक कंपनीने एवढा घोळ घालून सुद्धा पुन्हा काम त्याच कंपनीला देणं हा अक्षम्य गुन्हा आहे. आजही विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन देण्यात आलं. बुधवारी आम्ही कुलगुरूंची भेट घेणार असून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढणार आहोत.
- भालचंद्र मुणगेकर, माजी कुलगुरु, मुंबई विद्यापीठ
हेही वाचा -
टीवायबीकाॅम परीक्षेच्या वेळापत्रकात बदल