कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये प्रत्येक भागात नवनवीन पाहुणे येऊन आपला अनुभव शेअर करीत असतात. यात विविध क्षेत्रांमधील पाहुण्यांचा समावेश असतो. संगीताचा वारसा लाभलेले महाराष्ट्राचे दोन लाडके गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या मकरंद अनासपुरेंसोबत आदर्श-राहुलचा गप्पांचा फड रंगला आणि भूतकाळाच्या गाठी उलगडत जुन्या आठवणी समोर आल्या. गप्पांसोबत या कार्यक्रमात गाणी देखील सादर झाली. राहुलने लहानपणीच्या आठवणींसोबतच पु. ल. देशपांडे यांच्या आठवणी देखील सांगितल्या. राहुल आणि आदर्श यांनी बरीच धम्माल मस्तीही केली. त्यामुळे मकरंदने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी काय उत्तरं दिली तसंच कोणते किस्से सांगितले ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मकरंदने जेव्हा राहुलला आनंद आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली का? विचारल्यावर तो म्हणाला की, नक्कीच. आनंद शिंदे यांची बरीच गाणी ऐकली आहेत. गणपतीच्या वेळेला मिरवणुकीला जायचो, तेव्हा तिथे त्यांची गाणी असायची. आदर्शने 'बाप्पा मोरया रे...' या गाण्याच्या दोन ओळी म्हणून दाखविल्या. आदर्श आणि राहुल एकत्र असल्यावर गाणी सादर होणार नाही, असं शक्यच नाही. राहुलने 'बगळ्यांची माळ फुले...' हे गाणं सादर केलं. यानंतर प्रश्न उत्तराचा खेळ सुरु झाला. आदर्शला कसला राग येतो हे विचारल्यास तो म्हणाला की, मला कसलाच राग येत नाही आणि आलाच तर मी तिथून निघून जातो. कोणालाही दुखवायला मला आवडत नाही असे तो म्हणाला.
चक्रव्यूह राऊंडमध्ये आदर्शला सुरेश वाडकर यांच्याविषयी एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली असता तो म्हणाला की, आवडती गोष्ट म्हणजे 'आवाज'. जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो, तेव्हा मला नेहेमी वाटायचं असं गाणं मला आयुष्यात कधीच जमणार नाही. गाणं सोडून दिलेलंच बरं. यानंतर आदर्शने सुरेश वाडकर यांचं 'ए जिंदगी...' हे गाणं म्हणून दाखवलं. याच राऊंडमध्ये राहुलला प्रशांत दामले यांच्याबाबत आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली, तेव्हा तो म्हणाला की, आवडती गोष्ट म्हणजे 'सळसळतं चैतन्य'. तसंच या दोघांना दोन संवाद दिले जे त्यांना गाण्याच्या चालीत म्हणायचे होते. राहुलने पु.ल.देशपांडे यांची एक सुंदर आठवण प्रेक्षकांना सांगितली.
गप्पांच्या या ओघात राहुलने एक कटू सत्य सांगितलं. राहुल म्हणाला की, आज शास्त्रीय संगीतावर घर चालवणं खूप कठीण आहे. कारण ते एका विशिष्ट वर्गाकरता आहे. जेव्हा राजाश्रय होता, तेव्हा उत्तम होतं, पण आता लोकाश्रयमध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टीदेखील बरोबरीने कराव्या लागतात.
हेही वाचा -
संस्कृती-परंपरेचं महत्त्व सांगणार सौरभचा 'शुभं भवतु'!
कादर खान यांची प्रकृती नाजूक; कॅनडात उपचार सुरू