'कॉफी विथ करण' शो मध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून रोष ओढावून घेणाऱ्या हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या वादावर अखेर करण जोहरनं मौन सोडलं आहे. हार्दिक आणि राहुलला आपल्या विधानाची चांगलीच किंमत चुकवावी लागल्याचं करण जोहरनं म्हटलं आहे. त्याचवेळी या सगळ्यासाठी त्यांनं स्वत:लाही जबाबदार धरत माफी मागितली आहे.
'कॉफी विथ करण' शो मध्ये हार्दिक पांड्या आणि राहुल यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानानंतर सर्वच स्तरातून दोघांवर टीका होत असून त्याचा मोठा फटकाही दोघांना बसला आहे. बीसीसीआयनं दोघांची कानउघाडणी करत प्रकरणाची चौकशी होईपर्यंत दोघांना निलंबित केलं आहे.तर अनेक ब्रॅण्डने-कंपन्यांनी या दोघांसोबत असलेला करार संपवला आहे.
हार्दिक आणि राहुलवर सर्व स्तरातून टीका होत असताना ज्या शोमधून त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं त्या शोचा अँकर करण जोहर मात्र मौन बाळगून होता. करण जोहर यावर नेमकं काय म्हणतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार अखेर उशीरा का होईना पण करण जोहरनं मौन सोडलं आहे. माझ्या शोमध्ये मी हार्दिक आणि राहुलला आंमत्रित केलं होतं. त्यामुळे मी ही या प्रकरणाला तितकाच जबाबदार आहे अशा शब्दात करण जोहरनं सर्वांचीच माफी मागितली आहे.
हार्दिक आणि राहुलचं विधान आक्षेपार्ह होतं. या प्रकरणानंतर माझी झोपच उडाली आहे. प्रश्न विचारणं माझ्या हातात असतं. पम त्यावर समोरच्या व्यक्तिनं काय आणि कसं उत्तर द्यावं हे मात्र माझ्या हातात नसतं. हेच हार्दिक आणि राहुलच्या वेळेस झालं असं स्पष्टीकरणही करण जोहरनं दिलं आहे. तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांची माफी मागत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा