चीनमध्ये रंगलेल्या 'मिस वर्ल्ड २൦१७' या स्पर्धेत मिस इंडिया मानुषी छिल्लरनं बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तब्बल १७ वर्षानंतर हा किताब भारताकडे आला आहे. २०१६ मधील मिस वर्ल्ड प्यूटो रिकोची स्टेफनी डेल वलीनं विश्व सुंदरीचा मुकुट मानुषीच्या डोक्यावर घातला.
Thank you, everyone, for your constant love, support at prayers! @feminamissindia @MissWorldLtd #MissWorld2017 This one's for #India pic.twitter.com/kcnLV4C22P
— Manushi Chhillar (@ManushiChhillar) November 18, 2017
विश्वसुंदरी स्पर्धेत मिस इंग्लंड स्टेफनी हिल ही दुसऱ्या, तर मिस मेक्सिको अँड्रीया मेझा तिसऱ्या स्थानी राहिली. जवळपास ११८ देशांच्या सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या सौंदर्यावतींना मागे टाकत हा किताब पटकावला.
अंतिम फेरीत दिलेल्या उत्तरानं मानुषीनं सर्वांची मनं जिंकली. तुमच्यानुसार कोणत्या प्रोफेशनला जास्त पैसा आणि आदर मिळाला पाहिजे आणि का? असा प्रश्न तिला अंतिम फेरीत विचारण्यात आला होता. यावर तिनं उत्तर दिलं की, माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. आईच्या प्रेमाची किंमत नाही लावता येणार. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिलं पाहिजे. त्यामुळे माझ्या मते आई हे एक असं प्रोफेशन आहे, ज्याला सर्वात जास्त आदर दिला पाहिजे. मानुषीच्या या उत्तरानं परिक्षकांसोबत प्रेक्षकांचीही मनं जिंकली.
१९६६ मध्ये भारताच्या सौंदर्यवतीनं पहिल्यांदा 'मिस वर्ल्ड'चा किताब पटकावला होता. मेडिकलचीच विद्यार्थिनी असलेल्या रिता फारिया हिनं सर्वात पहिला बहुमान मिळवला होता. त्यानंतर १९९४ मध्ये ऐश्वर्या रायने बाजी मारत मिस वर्ल्डचा किताब पटकावला. तर १९९७ मध्ये डायना हेडन, १९९९ मध्ये युक्ता मुखी आणि २००० मध्ये प्रियंका चोप्रानं हा किताब पटकावला होता.
हेही वाचा