मुंबईचं फुफ्फुस अशी ओळख असणाऱ्या आरे जंगलाला वाचवण्यासाठी मुंबईतील पर्यावरण प्रेमी, आदिवासी बांधव आणि विविध संस्थांनी पुढं येत सेव्ह आरे ही मोठी जनचळवळ उभी केली आहे. मेट्रो-३ प्रकल्पाबरोबरच इतर कुठल्याही प्रकल्पाच्या नावावर आरेचा बळी जाऊ नये यासाठी हे सर्व न्यायालयीन लढाईसह रस्त्यावरची लढाई लढत आहेत.
सेव्ह आरेची ही जनचळवळ वा रस्त्यावरची लढाई आता केवळ मुंबईपुरती मर्यादीत राहिली नसून मुंबईच्या, राज्याच्या सीमा पार करत ही सेव्ह आरेची हाक आता देशाच्या कानाकोपऱ्यातून घुमू लागली आहे. दिल्ली, हैद्राबाद, पाटियाला, चंदीगडवासीयही सेव्ह आरेचा नारा देत आरे वाचवण्यासाठी पुढं येताना दिसत आहेत.
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे जंगलातील जमीन देण्यात आली अाहे. त्यामुळं जंगलाचा मोठा भाग नष्ट होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. तर अन्यही काही प्रकल्पांसाठी आरे जंगलातील जागा देण्यात येणार असल्यानं जंगल हळूहळू नष्ट होणार आहे. त्यामुळं हा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि आरे जंगल वाचवण्यासाठी वनशक्ती, सेव्ह ट्री आणि सेव्ह आरेसारख्या संस्थांनी सेव्ह आरे ही विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचत आरे वाचवण्यासाठी जनचळवळ उभी करत सरकारला आरे वाचवण्यासाठी भाग पाडणं हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे.
गेल्या काही दिवसांत सेव्ह आरे चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी या संस्थांनी सोशल मिडीयाचा आधार मोठ्या प्रमाणावर घेतला आहे. SAVE AAREY, Aarey Conservation Group नावानं फेसबुक पेज तयार करण्यात आली आहेत. या फेसबुक पेजला मुंबईकरांचाच नव्हे तर देशभरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्विटर आणि व्हाॅट्सअपच्या माध्यमातूनही सेव्ह आरे जनचळवळ देशभरात पोहचत असल्याची माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे. तर या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त करत हा जनआक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहचेल आणि आरे वाचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दिल्ली-चंदीगड-पटीयालामधील महाविद्यालयीन तरूण-तरूणींकडून तर उत्तरखंडमधील कुटुंबांकडूनही सेव्ह आरेचा नारा दिला जात आहे. सेव्ह आरेला पाठिंबा देणाऱ्या या इतर राज्यातील नागरिकांकडून सोशल मिडीयावर फोटो टाकले जात आहेत. तर सरकारलाही आरे वाचवण्यासाठी आर्जव केलं जात आहे. त्यामुळं सेव्ह आरेला मिळणारा हा प्रतिसाद महत्त्वाचा ठरत आहे.
हेही वाचा -
यंदाही पाऊस कमी, सप्टेंबर कोरडाच