Advertisement

पूरस्थिती रोखण्यासाठी मुंबई भोवती तटबंदीचा पर्याय

समुद्राच्या पातळीत वाढ होऊन समुद्र किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.

पूरस्थिती रोखण्यासाठी मुंबई भोवती तटबंदीचा पर्याय
SHARES

जल प्रलयापासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई भोवती तटबंदी बांधण्याच्या पर्याय ‘मुंबई फर्स्ट’ या विचारमंचानं शासनाला सुचवला आहे.

संस्थेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना याबाबतचं पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी अनेक पर्याय सुचवले आहेत. 

वातावरणातील बदल आणि तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन समुद्र किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. मुंबईतील अनेक भाग समुद्र गिळंकृत करणार असल्याच्या भितीनं चिंता व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर संभाव्य धोक्याना तोंड देण्यासाठी मुंबई फर्स्टनं शासनाला काही उपाय सुचवले आहेत.

पालिका आयुक्त हे या कृती दलाचे अध्यक्ष असतील. स्थानिक आणि वैश्विक वातावरण बदलाविषयीचे तज्ज्ञ, धोरण तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, पर्यावरणशास्त्रातील तज्ज्ञ यांचा या दलात सहभाग असावा, असं सुचवण्यात आलं आहे.

मुंबईत भरतीच्यावेळी शिरणाऱ्या पाण्यामुळे अनेक भाग जलमय होतात. येत्या काळात ही समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्याला अटकाव करण्यासाठी समुद्राच्या बाजूला धरणाप्रमाणे भिंत बांधण्याचा उपाय सुचवण्यात आला आहे.

यामुळे शहरात शिरणारे पाणी अडेल आणि शहरातील पाणी उदचन यंत्रणेच्या माध्यमातून बाहेर काढता येईल. याच बरोबर पूरस्थिती, हवामान याचे अचूक पूर्वानुमान देणारी यंत्रणाही सक्षम करणं आवश्यक आहे असं मुंबई फर्स्टचे नरेंद्र नायर यांनी सांगितलं.

वातावरण विषयक माहितीच्या संकलनासाठी आणि निरीक्षणासाठी एका विशेष केंद्राची निर्मिती करणं, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणं, आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थानिक स्तरावर यंत्रणा उभी करणं, त्याचबरोबर शेतीचे संरक्षण, शहरातील पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत वारंवार आलेल्या नैसर्गिक आपत्तींची दखल घेऊन भविष्यात त्या टाळण्यासाठी वातावरण बदल कृती आराखडा तयार करण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलं आहे. याविषयी सूचना पाठवण्याचे आवाहन तज्ज्ञांना करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘मुंबई फर्स्ट’नेही काही सूचना पालिकेला दिल्या आहेत.



हेही वाचा

खारफुटी क्षेत्रावर आता सीसीटीव्हीची नजर

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा