चिमुकल्या पावलांनी वाळूत सरपटत चालणारी छोटी छोटी कासवं...७० ते ८० कासवांची फौज... छोटी छोटी पावलं घेत त्यांची वाटचाल सुरू झाली आणि बघता बघता खवळणाऱ्या समुद्रात ही कासवं गुडूप झाली. रत्नागिरीतल्या अंजर्लेत सुरू असणाऱ्या कासव फेस्टिव्हलमध्ये अनेकांना हा सुखद अनुभव आला असेल. पण चक्क मुंबईसारख्या शहरात हा अनुभव येणं म्हणजे विशेष आहे.
मुंबईतल्या वर्सोवा बीचवर घरट्याबाहेर पडणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीची सुमारे ८० कासवं आढळली. खरंतर कुणाला विश्वास बसणार नाही असाच हा क्षण होता. पण स्वच्छता दूत अफरोज शहा यांच्यामुळे त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या मुंबईकरांना हा क्षण अनुभवता आला. अफरोज शहा यांच्या मोहिमेला यश आलं आहे, याचा दाखला वर्सोवा बीचवर आलेली कासवं देतात.
स्वच्छतादूत अफरोज शहा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बीचवर घरटी आढळली. तयानुसार निरीक्षण केले असता कासवाच्या मोठ्या घरट्यांमध्ये पिल्लं असल्याचं लक्षात आलं. सागरी परिसंस्थेतील जीवाच्या बचावासाठी तयार करण्यात आलेल्या मरीन रिस्पॉण्डण्ट या गटातील कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर ही ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची पिल्ल असल्याचं लक्षात आलं. तज्ञ मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ८० पिल्लांना त्यांच्या घराकडे म्हणजेच समुद्रात रवाना करण्यात आलं.
मुंबईच्या किनाऱ्यावर जवळपास २० वर्षांनंतर असा दुर्मिळ क्षण अनुभवता आला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभर तरी वर्सोवा बीचवर निरीक्षण करण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक मच्छिमारांना देखील किनाऱ्यावर मासेमारी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये ही पिल्लं याच बीचवर येऊन पुन्हा घरटी बनवू शकतात. त्यामुळे आता वर्सोवा बीचवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
Yes yes .. We did it .. Thank you Afroz . Here is the journey . lovely Mumbaikars . we did . Urban cities getting our olive Ridley turtle back . pic.twitter.com/vg4ZJe5cTk
— Clean Up Versova (@versovabeach) March 22, 2018
मुंबईत पूर्वीसारखे किनारे आता फारसे उरले नाहीत. त्यातल्या त्यात वर्सोवा बीच कासवांसाठी अनुकूल आहे. पण दोन वर्षांपूर्वी वर्सोवा बीचची परिस्थिती वेगळी होती. गेल्या अनेक वर्षांपासून वर्सोवा बीच अस्वच्छ होता. कचऱ्याचा ढीग वर्सोवा बीचवर साचलेला होता. पण स्वच्छतादूत अफरोज शहा आणि त्यांचे साथीदार गेल्या दोन वर्षांपासून बीचवर स्वच्छता मोहीम राबवत आहेत. त्यांच्यामुळे आज वर्सोवा बीच श्वास घेत आहे.
ऑलिव्ह रिडेल कासव प्रसिद्ध आहे. कासवाचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्र येतात. कोकण किनारपट्टीवर ही कासवं आढळून येतात. ज्या किनाऱ्यांवरील वाळू सतत स्थिती बदलत असते, त्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले अंडी घालतात.
पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत. परंतु, त्यांची संख्या सातत्याने घटल्यामुळे यावर बंदी घालण्यात आली. तसंच, मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. त्यानुसार रत्नागिरीत एप्रिल ते मार्च कासव फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतो. जेणेकरून ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ प्रजातीचे संवर्धन होईल.