मागील ४ दिवसात मुंबईतील वातावरणात अचानक बदल झाला आहे. मुंबईतील अनेक भागात सकाळी थंड तर दुपारी गरम वातावरण असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. हवामानात बदल होण्याचं कारण म्हणजे अरबी समुद्रात आलेली कयार आणि महा ही दोन चक्रीवादळं. या चक्रीवादळांमुळे मुंबईकरांना सकाळी थंडीचा तर दुपारी उन्हाळ्याचा अनुभव मिळतोय.
मुंबईत अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात सरासरी ८ ते १० अंशाचा फरक नोंदवला गेला आहे. गोरेगाव आणि घाटकोपर येथील कमाल तापमान ६ नोव्हेंबर रोजी ३५ अंश सेल्सियसहून अधिक नोंदविण्यात आले. तर, कुलाबा, वरळी, माझगाव, दादर, वांद्रे, बीकेसी, अंधेरी, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, चेंबूर, विद्याविहार, पवई, जोगेश्वरी, भांडुप, मुलुंड, नेरुळ, पनवेल येथे याच दिवशी कमाल तापमान ३० ते ३४ अंश होते.
कुलाबा, वरळी, बीकेसी, घाटकोपर येथे किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. वरळी, माझगाव, दादर, वांद्रे येथे २४ अंश किमान तापमान आहे. गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, बोरीवली, पवई, जोगेश्वरी, भांडुप आणि मुलुंड येथील किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सियस होते. गोरेगाव, घाटकोपरचे कमाल तापमान बुधवारी ३५ अंश सेल्सियसहून अधिक होते. हे या दिवसाचे मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान होते.
हेही वाचा -
'एक बीज एक सावली' पर्यावरणप्रेमींचा नवा उपक्रम
अरे बापरे! 'या' कारणामुळे २०५० पर्यंत मुंबई होणार गायब