मुंबईसह राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळं लाखो कुटुंबीयांच्या घरातील सामान पूराच्या पाण्यात वाहून गेलं, जनावरही वाहून गेली. त्याशिवाय ऐन तोंडावर आलेल्या गणेशोत्सवासाठी साकारण्यात आलेल्या सर्व गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि कार्यशाळाही वाहून गेल्या आहेत. तसंच, ज्या भक्तांच्या घरी गणपती विराजमान होतात. त्यांना बाप्पाला घरी कसं आणायचं असा प्रश्न पडला होता. मात्र, त्यांना आलेल्या या अडचणीवर मात करता यावी यासाठी मुंबईतील सचिन शेटे यांच्या 'कलासागर आर्ट' या कार्यशाळेत तयार केलेल्या सर्व बाप्पांच्या मूर्ती पूरग्रस्तांना दिल्या आहे.
परळ वर्कशॉप येथील 'कलासागर आर्ट' या घरगुती गणेश मूर्तींच्या कार्यशाळेत या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. जवळपास ३ ते ४ हजारहून अधिक मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. या सर्व बाप्पाच्या मूर्ती 'कलासागर आर्ट' कार्यशाळेतील कामगारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी आणि कोकण या पूरग्रस्तभागात जाऊन दिल्या आहेत. यासोबत पूजेचं साहित्य आणि पाटही यांचंही वाटप केलं. बाप्पाच्या मूर्त्यांनी भरलेली तीनहून अधिक ट्रक कोल्हापूरला पाठविण्यात आल्याचं सचिन शेटे यांनी सांगितलं.
गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्रावर ही परिस्थिती ओढावल्यानं मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात पुढे केला. काही मंडळांनी आर्थिक मदत केली असून काहींना जीवनाश्यक वस्तूंची मदत केली आहे. मुंबईत अनेक अशी मंडळं आहेत, जी गणेशोत्सवाच्या १० दिवसांत पेटीत जमणारी रक्कम पूरग्रस्तांना देणार आहेत. त्यामुळं यंदा सचिन शेटे यांनी यंदाच्या वर्षी या परिस्थितीवर मात करण्यासाठी धंदा न करता सर्व मूर्ती पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला. पूरग्रस्त भागातील नागरीकांना यंदा गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी सचिन शेटे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्यानं पूरग्रस्त भागात बाप्पाच्या मूर्तींचं वाटप केलं.
सचिन यांच्या 'कलासागर आर्ट' मधील बाप्पाच्या मूर्ती या वजनानं हलक्या आहेत. याचं कारण म्हणजे या मूर्तींची प्रभावळ ही फायबरचा वापर करून बनविण्यात आली आहे. फायबरच्या प्रभावळ असल्यानं मूर्तींचं वजन कमी होतं. आगमन आणि विसर्जनावेळी उचलणं खूपचं जड जायचं. त्याचप्रमाणं एखादी मूर्ती २ ते ३ फुटांची असेल, तर ती मूर्ती उचलण्यासाठी २ माणसांची गरज भासते.
मुंबईमध्ये आतापर्यंत फक्त सार्वजनिक गणेश मूर्तींनाच फायबरची प्रभावळ लावण्यात येत होती. सार्वजनिक गणेश मूर्तींचं वजन जास्त असल्यामुळं त्या उचलणं गणेश मंडळांना जड पडत होतं. त्यामुळं या मूर्तींचं वजन कमी करण्यासाठी त्यांना फायबर प्रभावळ लावली जाते.
हेही वाचा -
गणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार
गणेशोत्सव २०१९: पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात