राज्यात राज्यात कोरोना कहर कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात २५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी २५ हजार ६८१ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग राज्याला पुन्हा लाॅकडाऊनकडे तर नेणार नाही ना याची चिंता सर्वांनाच लागली आहे.
मागील तीन दिवस राज्यात रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचं दिसत आहे. बुधवारी २३ हजार १७९ तर गुरुवारी २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा २५ हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
शुक्रवारी राज्यात ७० रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५३ हजार २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० टक्के एवढा आहे. शुक्रवारी १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत २१ लाख ८९ हजार ९६५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४२ टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८० लाख ८३ हजार ९७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख २२ हजार २१ (१३.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ६७ हजार ३३३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ८४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.़
राज्यात १ लाख ७७ हजार ५६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक ३७ हजार ३८४ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ नागपूर हा आकडा २५ हजार ८६१ वर गेला आहे. मुंबईत सध्या १८ हजार ८५० तर ठाणे जिल्ह्यात १६ हजार ७३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हेही वाचा-
१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता
महाराष्ट्रात कोविड लसीचे दररोज ३ लाख डोस द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश