राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये रोज आठ हजारांनी वाढ होत आहे. मात्र, सोमवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सोमवारी कोरोनाचे ६३९७ नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर आज ५७५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. .
सोमवारी राज्यात ३० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण २० लाख ३० हजार ४५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९४ टक्के झाले आहे. तर मृत्यूदर २.४१ टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६३,४६,३५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६१,४६७ (१३.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४३,९४७ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ३,४८२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तसेच, राज्यात सध्या ७७,६१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
सर्वाधिक १५ हजार १९९ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. नागपूर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून आता १० हजार १६७ इतकी झाली आहे. मुंबई पालिका हद्दीत ही संख्या ८ हजार २९४ इतकी असून ठाणे जिल्ह्यात सध्या ८ हजार ७३ रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्णवाढीला ब्रेक लावण्यासाठी सर्वच जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक पावले टाकण्यात येत आहेत. विदर्भातील अमरावती, नागपूरसह काही जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. विदर्भात स्थितीनुसार जमावबंदी, संचारबंदी आणि लॉकडाऊनसारखी पावले उचलण्यात आली आहेत.