सुपरहिरो अडचणीत सापडलेल्या व्यक्तींचं नेहमी रक्षण करतो, असं आपण एखाद्या दंतकथेत वाचलं किंवा ऐकलं आहे. या सुपरहिरोंना भेटण्याची उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली असते. मात्र दंतकथेतील सुपरहिरो खऱ्या आयुष्यातही असतात का? की ही निव्वळ कल्पना आहे, असे प्रश्न कधीतरी तुम्हाला पडत असतीलच. मात्र खऱ्या आयुष्यातही असे अनेकजण आहेत की त्यांना मनापासून "सुपरहिरो" म्हणावसं वाटत. त्यापैकीच एक म्हणजे रतनेश गुप्ता. १५० पेक्षा जास्तवेळा रक्तदान करणारे ६५ वर्षांचे रतनेश सध्या स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यामुळे आता ते रक्तदान करू शकत नाही. मात्र तरीही अखेरच्या श्वासापर्यंत रक्तदानाचं आवाहन करणार असल्याचं त्यांनी १४ जून जागतिक रक्तदाता दिनाच्या दिवशी सांगितलं.
ठाणे, घोडबंदर इथं राहणारे रतनेश गुप्ता मूळचे मुंबईकर आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या शहराबद्दल खूप प्रेम आहे. पत्नी आणि २ मुले असं त्यांचं लहानसं कुटुंब आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते विविध उपक्रमात सक्रिय असत आणि हीच गोष्ट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली.
घाटकोपर येथील एका रुग्णालयात एका रुग्णाचं अपघातामुळे जास्त प्रमाणात रक्त वाहून गेलं. "बी नेगेटिव्ह" या रक्तगटाचं रक्त सहसा उपलब्ध होत नाही. त्या काळात रतनेश हे शालेय शिक्षण घेत होते. त्यांची शाळा त्या रुग्णालयाच्या जवळ असल्याने रतनेश यांना रुग्णाची माहिती मिळताच जराही विलंब न लावता त्यांनी रक्तदान करण्याचं ठरवलं, त्यावेळी रतनेश यांना आपला रक्तगट कोणता हे देखील माहीत नव्हते. पण रक्त दिल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचतील हे त्या बालमनाला समजलं होतं.
सुदैवाने रतनेश यांचा रक्तगट हा "बी निगेटिव्ह" निघाला आणि त्या रुग्णाचे प्राण वाचले. त्यानंतर रतनेश यांना आपला रक्तगट अत्यंत दुर्मिळ असल्याची जाणीव झाली आणि तेव्हापासून दर तीन महिन्यातून एकदा ते रक्तदान करत. आतापर्यंत तब्बल १५० पेक्षा जास्त वेळा त्यांनी रक्तदान केलं आहे.
चेंबूर येथील आरसीएफ फॅक्ट्रीमध्ये उच्चपदावर कार्यरत असलेले रतनेश सध्या निवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवावृत्तीमुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. श्रमवीर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ कामगार पुरस्कार आणि सेंट्रल लेबर मिनिस्टर नॅशनल अवार्ड याशिवाय ३ राष्ट्रीय पुरस्काराने रतनेश यांना सन्मानित केलं आहे.
गेली ३५ वर्ष न चुकता रक्तदान करणारे रतनेश गुप्ता दोन वर्षापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. त्यांचा हा कर्करोग इतका प्रभावी झाला की आता त्यांना तोंडाचा कर्करोग झाला आहे. त्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या रतनेश स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यावर आहेत. आता रतनेश आपला संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवत आहेत.
मी माझ्या आयुष्यात रक्तदान करून खूप सुखी आहे. कँसरमुळे मला आता रक्तदान करणे शक्य होत नाही. याची मला खंत आहे. पण माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी रक्तदानाचं महत्व लोकांना नक्कीच सांगणार
- रतनेश गुप्ता
हेही वाचा-
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं 'कामबंद आंदोलन' सुरु!
आयुर्वेदाच्या साथीने कॅन्सरवर करा मात!